Advertisement

मुंबईत अतिवृष्टीचा इशारा; समुद्रात मोठ्या उंचीच्या लाटा


मुंबईत अतिवृष्टीचा इशारा; समुद्रात मोठ्या उंचीच्या लाटा
SHARES

मान्सूनच्या आगमनानंतरही बराच काळ लांबलेला पावसानं शुक्रवारी सकाळपासूनच चांगलाच जोर धरला. मुंबई व उपनगरांना या पावसानं चांगलंच झोडपून काढलं असून भारतीय हवामान विभागानं शनिवारी मुंबई शहर व उपनगरातील काही भागांत अतिवृष्टीचा इशारा दिला. तसंच, समुद्रात ४.४ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत. हवमान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक सखल भागांच पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मागील काही आठवड्यांपासूनच पाऊस सक्रिय झाला होता. मात्र असं असलं तरी मुंबईकरांना पावसाची फार काळ प्रतिक्षा करायला लागली. मुंबई महानगरपालिकेनंही २४ विभाग कार्यालयातील सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार शनिवारी मुंबईसह रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांतही रेड अलर्ट देण्यात आला. पुढील दोन दिवस ही स्थिती कायम राहणार असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व विभाग नियंत्रण कक्षांना 'हाय अलर्ट' देण्यात आले असून मनुष्यबळ व साधनसामुग्रीसह सुसज्ज राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. पर्जन्य जलवाहिन्या विभागाची ६ उदंचन केंद्रे सुसज्ज असून २९९ ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बसविण्यात आलेले पाण्याचा उपसा करणारे संच कार्यान्वित रहातील, याचीही खातरजमा करण्यात आली आहे. या अनुषंगाने आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई अग्निशमन दलाने त्यांची पूर बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह ६ प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात ठेवावीत, असे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या ३ तुकड्यांना आणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरिता तत्पर रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांच्या समन्वय अधिका-यांना त्वरीत मदतीकरिता तत्पर रहाण्यास सांगण्यात आले आहे.

संभाव्य अतिवृष्टी आणि त्याच वेळी असणारी मोठी भरती याबाबत प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून सर्व भ्रमणध्वनी कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांना सतर्क करणारे संदेश पाठविण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष व पर्यायी बॅकअप नियंत्रण कक्ष येथे पुरेसे मनुष्यबळ कार्यरत ठेवण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले असून त्यानुसार नियोजनात्मक अंमलबजावणी करण्यात आली आहे. आणीबाणी मदत यंत्रणांपैकी मुंबई पोलीस दल, महापालिकेचे मुंबई अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, बीईएसटी (वाहतूक व विद्युत), शिक्षण खाते, आरोग्य खाते, पर्जन्य जलवाहिन्या यासारख्या विविध यंत्रणाचे समन्वय अधिकारी, मुख्य नियंत्रण कक्षात उपस्थित असणार आहेत.



हेही वाचा -

मुसळधार पावसामुळे मुंबईतील 'हे' रस्ते बंद

पीपीई कीटमध्येच डॉक्टर तरुणी थिरकली ‘हाय गर्मी’वर, पहा हा भन्नाट डान्स



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा