आता पुढचे ५ दिवस राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. १५ मार्च ते १८ मार्चपर्यंत राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गारपीटी पडण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर यावेळी वाऱ्याचा वेगळी जास्त असेल, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पालघर, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता राज्यात सर्वदूर पाऊस होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पुढच्या ५ दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस होईल. यावेळी गारपीटही होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १६ तारखेला राज्यातील ४ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट असणार आहे. यामध्ये पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे. इथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, यावेळी मुंबई ते गडचिरोली आणि कोल्हापूर ते नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भातही काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त होण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच ही परिस्थिती पुढील काही दिवस कायम राहणार आहे. दरम्यान, खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी वादळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे १५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
हेही वाचा