मुंबई, पालघरसह राज्याच्या विविध भागांत पुढील तीन-चार तासांत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. यादृष्टीनं खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार आदी जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. पुढील काही दिवस पावसाची संततधार कायम राहणार असल्याचं हवामान खात्यानं याआधीच जाहीर केलं होतं.
बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र किनारपट्टी ओलांडून देशाच्या मध्यवर्ती भागात जाण्याची शक्यता आहे. कोंकण आणि लगतच्या भागांवर याचा परिणाम होईल. यामुळे मुंबईला पुढील दोन दिवस किमान पावसाची शक्यता आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. वाशिष्ठी नदी पात्राची पातळी सध्या धोक्याची नाही. मात्र असाच पाऊस पडत राहिला तर नदीपात्रामध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे नगरपालिकेनं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला कोकण विभागातील मुंबई, ठाण्यासह कोकणात काही ठिकाणी पावसाची हजेरी होती. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. सध्या कोकण विभाग वगळता इतरत्र पावसाचा जोर ओसरला आहे.
कोकण विभागात पुढील आठवडाभर अनेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाऊस असणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतर कोकणासह राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा