मुंबईसह उपनगरात कोसळणाऱ्या पावसानं मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. पावसाच्या विश्रांतीनंतर मुंबईकरांना ऑक्टोबर हीटची जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळं मुंबईकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो. आहे. त्याचप्रमाणं मान्सूननंही मुंबईमधून सोमवारी माघार घेतली आहे.
मुंबईतून मान्सूननं माघार घेतल्यानं अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला. कारण राज्यामध्ये यंदा पडलेल्या मुसळधाप पावसामुळं अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली होती. तासभर पडलेल्या पावसामध्ये मुंबई-पुण्यातील नागरिकांनी कहर अनुभवला असून, अखेर १४ दिवसांनी उशिरा मुंबईतून मान्सून परतला आहे.
राजस्थानमधून यंदा पावसानं ९ ऑक्टोबरला परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.त्यानंतर, मात्र परतीचा प्रवास वेगानं झाला. अवघ्या ६ दिवसांत मान्सून मुंबईतून बाहेर पडला आहे. रविवारी परतीचा पाऊस महाराष्ट्राच्या सीमारेषेवर होता. त्यानंतर २४ तासांमध्ये पावसानं मुंबईची सीमारेषा ओलांडली.
रविवार ते सोमवार या काळामध्ये मान्सूनने गुजरात, मध्य प्रदेश, मुंबईसह दक्षिण कोकणाचा काही भाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि संपूर्ण विदर्भातून माघार घेतली. नैऋत्य मान्सूनची माघार सुरू असताना दुसरीकडे ईशान्येकडून येणाऱ्या पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे.
मान्सूननं माघार घेतल्यानंतर मुंबईतील तापमानात वाढ झाली आहे.पाऊसही तुरळक ठिकाणीच आपली उपस्थिती नोंदवत होता. सोमवारीही मुंबईचे कमाल तापमान ३५.९ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. हे तापमान सरासरी तापमानाहून तब्बल २.९ अंशांनी अधिक आहे. तर कुलाबा इथं कमाल तापमान ३५.२ अंश सेल्सिअस होतं. हे तापमानही सरासरीहून २.१ अंशांनी अधिक होते.
हेही वाचा -
पीएमसी प्रकरणी ३,८३० कोटींची मालमत्ता जप्त
दहावीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात