मुंबईच्या हवेनं जानेवारीच्या तुलनेत प्रदुषणाचा सर्वाधिक उच्चांक गाठला. ‘सफर’ संकेतस्थळानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या रविवारी मुंबईच्या पश्चिम उपनगरामधील काही भागांमध्ये सर्वाधिक वायू प्रदूषण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या रविवारी दिवसा सरासरी एक्यूआई (AQI) १७५ नोंदवण्यात आला होता. जो नंतर वाढून एक्यूआई २८१ पर्यंत पोहोचला होता. त्याच दिवशी म्हणजे रविवारी रात्री तो एक्यूआई २७० इतका नोंदवला गेला.
सफरनुसार, २०१ ते ३०० या दरम्यानची हवेची गुणवत्ता निकृष्ठ दर्जाची मानली जाते. येत्या काही दिवसात हवेची गुणवत्ता याहून निकृष्ठ दर्जाची होऊ शकते. येत्या काही दिवसांत शहरातील काही भागातील हवेची गुणवत्ता एक्यूआय २८३ वर पोहोचू शकते. शहरातील वाहनांची वाढती संख्या आणि जागोजागी चालणारे बांधकाम यामुळे प्रदूषणात होणारी वाढ यात काही नवल नाही.
नवी मुंबई आणि वांद्रे-कुर्ला संकुल या भागामध्ये सर्वाधिक असे वायू प्रदूषण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. नवी मुंबईमध्ये एक्यूआई ३४७ तर वांद्रे-कुर्ला संकुल इथं एक्यूआई ३२२ इतकी नोंद करण्यात आली आहे. यासोबतच मुंबईतल्या ५ ठिकाणी हवेची गुणवत्ता दर्जाहिन असल्याचं समोर आलं आहे. त्याखालोखाल अंधेरी, मालाड, बोरीवली, चेंबूर, माझगाव, कुलाबा, वरळी, भांडूप यांचा नंबर लागतो. भांडूप एक्यूआई १४८ आहे.
सफरचे प्रकल्प संचालक गुफरान बेग म्हणाले, "वारे अतिशय शांत वाहत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर होणारे उत्सर्जन साचत आहे. परिणामी उच्च प्रदूषण पातळी वाढत आहे. "गेल्या वर्षाच्या एक्यूआय आकड्यांवर नजर टाकली तर असं दिसून येईल की, सर्वात प्रदूषित कालावधी जानेवारीचा होता. पण आताचे आकडे पाहता सर्वाधिक प्रदूषण यावर्षीच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पाहायला मिळेल.
प्रदूषणाची वाढती समस्या हे काही आपल्यासाटी नवीन नाही. गेल्या महिन्यात वांद्रे इथं एक्यूआई ५०० इतकी हवेची गुणवत्ता होती. हा आकडा पाहून वांद्रे इथल्या हवेचा दर्जा सर्वाधिक खराब असल्याचं समोर आलं.
हेही वाचा