ओखी वादळामुळं मुंबईत २ दिवसांपूर्वी जोरदार पाऊस पडला. यामुळे मुंबईकरांनी ऐन हिवाळ्यात पावसाळा अनुभवला. त्यातच शनिवारी पहाटेपासूनच मुंबईकरांना धुक्याचा सामना करावा लागल्याने हा ऋतूमानाचा परिणाम की प्रदूषणाची देणगी? असा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांना पडला. खासकरून सकाळच्या सुमारास नोकरीधंद्याला निघालेल्या प्रत्येक मुंबईकराच्या तोंडी मुंबई मे क्या चल रहा है? 'फाॅग' की 'स्माॅग' असं वाक्य होतं.
अरबी समुद्रात आर्द्रता निर्माण झाल्याने मुंबईत सकाळी धुकं पसरलं होतं. पण हे केवळ धुकं नसून धूळमिश्रित धुरकं अर्थात 'स्माॅग' असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं. मंद वारा जमिनीच्या पातळीपेक्षा उंच गेल्यानं हवामानात बदल झाल्याची, माहिती हवामान खात्याने दिली. कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळेनं दिलेल्या अहवालानुसार हवामानातील बदलामुळे मुंबईतील काही ठिकाणी धुरकं पसरलं आहे.
एरवी तांत्रिक बिघाडामुळे कोलमडणारी मध्य रेल्वेमार्गावर लोकल शनिवारी 'धुरक्या'मुळे पुन्हा विस्कळीत झाली. मुंबईत शनिवारी पहाटेपासूनच सर्वत्र धुरकं पसरलेलं असल्यानं दोन फुटांवरील माणूसही नीट दिसत नव्हता.
कमी दृश्यमानतेमुळे पहाटे उपनगरातील रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं. मध्य रेल्वेच्या वासिंद स्थानकावर सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मुंबईकडे येणारी लोकल वेळेत आली नाही, म्हणून संतप्त प्रवाशांनी रेल रोको केला. दरम्यान रेल्वे आणि पोलिसांनी प्रवाशांना रेल्वे ट्रॅकवरून हटवलं. त्यानंतर दीड तासांनी लोकल वासिंदहून मुंबईसाठी रवाना झाली. या धुक्यामुळे मध्य रेल्वेच्या गाड्या ४० ते ५० मिनिटे तर पश्चिम रेल्वेच्या गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.