दिवाळी सुरू झाली की पहाटे गुलाबी थंडीची चाहुल लागण्यास सुरूवात होते. परंतु नोव्हेंबर महिना लागला, तरी मुंबईकर अजूनही आॅक्टोबर हिटच्या गर्तेतून बाहेर आलेले नाही. २० नोव्हेंबरनंतर मुंबईत थंडी दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्याने थंडीसाठी मुंबईकरांना आणखी १५ दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
यंदा जुलैनंतर पावसाने अचानक दडी मारली. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाच्या काही तुरळक सरी कोसळ्यानंतर सप्टेंबरच्या अखेरीसपासून सूर्यानं डोकं वर काढलं. तेव्हापासून मुंबईकरांना कडक उन आणि घामाच्या धारा यांचा सामना करावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळं हैराण झालेल्या मुंबईकरांना नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीपासून थंडी पडेल अशी आशा होती. परंतु नोव्हेंबर सुरू होऊन ५ दिवस उलटूनही थंडी न पडल्याने सर्वजण उकाड्यानं हैराण झाले आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे सध्या तापमानात घट होत असून मंगळवारी सांताक्रूझ इथं ३४.६ अंश सेल्सिअस तर कुलाबा इथं ३३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तसंच येत्या काही दिवसांत तापमानात आणखी घट होणार असून मुंबईकरांना थंडी जाणवू लागेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
साधारपणे बर्फाळ प्रदेशातून वारे यायला सुरुवात झाल्यानंतर थंडी पडायला सुरुवात होते. हिवाळ्यात साधारपणे २ ते ३ वेळा या वाऱ्यांचा वेग वाढतो आणि परिणामी थंडीचा जोरदेखील वाढतो. दरम्यान यंदा पाऊस कमी पडला असला तरी थंडीचा जोर मात्र कायम राहणार असून येत्या २० नोव्हेंबरनंतर मुंबईत थंडी पडेल.
- महेश पालावत, स्कायमेट, हवामानतज्ज्ञ
हेही वाचा-
ऑक्टोबर हिटच्या चटक्यांनी मुंबईकरांची लाही लाही!
मुंबईकरांनो, फटाके 'या' वेळेतच उडवा, नाहीतर खावी लागेल तुरूंगाची हवा