मुंबई - मुंबई शहर आणि उपनगरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. तसेच रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली आहे.
दादर, माटुंगा, वांद्रे भागात मंगळवारी रात्री जोरदार पाऊस झाला. दक्षिण मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही जोरदार पाऊस कोसळत आहे. सायन आणि अंधेरी परिसरात काही ठिकाणी पाणी भरले.
पावसाच्या संततधारेमुळे शहरातील दैनंंदिन जीवन विस्कळीत झाले. ऐन पावसात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने सकाळच्या सुमारास पश्चिम रेल्वेवर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. तर हार्बर मार्गावर सीएसटी ते अंधेरीदरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली होती. मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही पावसाचा परिणाम दिसून येत होता. दरम्यान, पालघर आणि बोईसरमध्ये ट्रॅकवर पाणी साचल्याने मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या आणि गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याचं पहायला मिळालं.
मुसळधार पावसाचा परिणाम रस्ते वाहतुकीवरही दिसून येत आहे. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. मुंबईत ईस्टर्न एक्स्प्रेस वे वर वाहतूक कोंडी झाली. तर ठाण्याजवळच्या खारेगाव टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झाल्याचे पहायला मिळाले. बुधवारी सकाळी 7.00 वाजेपर्यंत शहरात 76.37 मिमी, पश्चिम उपनगरात 118.84 मिमी आणि पूर्व उपनगरात 92.81 मिमी पावसाची नोंद झाली.