दिवाळी प्रदूषणमुक्त साजरी करावी, यासाठी अनेकदा जनजागृती केली जाते. पण, सुप्रीम कोर्टाने आवाजावर घातलेल्या बंदीमुळे आणि वारंवार होणाऱ्या जनजागृतीचा या वर्षी थोडा फार तरी फरक पडल्याचं आवाज फाउंडेशनने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झालं आहे.
आवाज फाउंडेशनने दरवर्षीप्रमाणे, यंदाही फटाक्यांच्या आवाजावर एक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार, मुंबईकरांनी यंदाची दिवाळी थोड्या प्रमाणात ध्वनीप्रदूषणमुक्त साजरी केल्याचं म्हटलं आहे.
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच लक्ष्मी पूजनाला मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. याच दिवशी मुंबईतील काही महत्त्वाच्या ठिकाणचा आवाज फाउंडेशनकडून सर्व्हे केला गेला. 19 तारखेला जाहीर केलेल्या अहवालानुसार, रात्री 10 पर्यंतची डेडलाईन असूनही मुंबईकरांनी रात्री 12 पर्यंत फटाके फोडले. पण, रात्री 12च्या आसपास फोडलेल्या फटाक्यांचा आवाज हा 10 पर्यंत फोडलेल्या फटाक्यांपेक्षा जास्त होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'प्रदूषणमुक्त दिवाळी जर साजरी करायची असेल, तर आपल्या मुलांना समजवा' असं आवाहन केलं. पण, जे फटाके लहान मुलांना दिले जातात, ते नेमके आवाजाचे फटाके आहेत, की प्रदूषणाचे हे पण बघितलं पाहिजे. तसंच, आपल्या राज्यात असे फटाके आणण्यावर बंदी घातली पाहिजे. जेणेकरुन लहान मुलांना समजवायची गरज भासणार नाही.
सुमायरा अब्दुलाली, अध्यक्ष, आवाज फाउंडेशन
मुंबईच्या मरीन ड्राइव्ह परिसरात फोडण्यात आलेल्या फटाक्यांच्या आवाजाची पातळी ही 100 डेसिबलच्या वरच असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. यावर्षी 117.8 डेसिबल एवढ्या आवाजाची पातळी फटाक्यांच्या आवाजाने गाठली आहे. गेल्या वर्षी 113 डेसिबल एवढ्या आवाजाची नोंद करण्यात आली होती.
वेळ | परिसर | आवाजाची पातळी |
---|---|---|
मध्यरात्री 12 नंतर | मध्यरात्री 12 नंतर | 117 डेसिबल |
8.45 - 9 (रात्री) | जुहू चौपाटी | 85.3 डेसिबल |
9.25 (रात्री) | वांद्रे तलाव | 94.6 डेसिबल |
9.53 (रात्री) | वरळी सी लिंक | 102.8 डेसिबल |
10.28 (रात्री) | गिरगाव चौपाटी | 88.3 डेसिबल |
10.40 (रात्री) | चौपाटी मैदान | 96.1 डेसिबल |
वारंवार होणाऱ्या जनजागृतीमुळे यंदाच्या वर्षी फाटक्यांच्या आवाजाची पातळी कमी आहे. शिवाय, मुंबईकरांनी मोठे किंवा आवाज करणारे फटाके कमी प्रमाणात फोडले आहेत.
सुमायरा अब्दुलाली, आवाज फाउंडेशन, अध्यक्ष
यंदा दिवाळी जरी ध्वनीप्रदूषणमुक्त साजरी झाली असली, तरी हवेच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर पडली असल्याचा अहवाल मुंबईतील सफर संस्थेने दिला आहे.
फटाक्यांचं प्रमाण जरी कमी असलं, तरी एकामागून एक फुटलेल्या फटाक्यांमुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेची पातळी खालावली आहे. बुधवारी हवेची गुणवत्ता मध्यम दर्जाची होती. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माझगाव येथे हवेचा दर्जा अतिशय वाईट होता. तर बोरिवली, अंधेरी आणि वांद्रे-कुर्ला संकुल या भागातही हवा वाईट होती.
मालाड, भांडूप, चेंबूर, वरळी आणि कुलाबा येथे हवेचा दर्जा समाधानकारक होता. पण, संध्याकाळी सातनंतर हे चित्र बदलत गेले. गुरुवारी रात्री लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तानंतरही काही ठिकाणी आतिषबाजी झाली. या पार्श्वभूमीवर शुक्रवारीही बोरिवली आणि माझगाव येथील हवेची गुणवत्ता अनुक्रमे धोकादायक आणि अतिवाईट दर्जाची असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वांद्रे सिग्नलला असलेल्या निर्देशकात बुधवारी संध्याकाळी 165 एवढ्या निर्देशांकाची नोंद झाली. हा निर्देशांक आरोग्यासाठी घातक असल्याचंही अहवालात म्हटलं आहे. शिवाय, यंदा दिवाळीतील हवेची गुणवत्ता तुलनेने गेल्या दोन वर्षांपेक्षा चांगली असल्याचं निरीक्षण सफरनं नोंदवलं आहे.
दिवाळीपर्यंत सुरू राहिलेल्या पावसामुळे, तसंच सध्याच्या वाऱ्याच्या स्थितीमुळे प्रदूषके एका ठिकाणी साचून राहिलेली नाहीत. शनिवारनंतर हवेची गुणवत्ता सुधारण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या काळात सर्वात हानीकारक असलेल्या 2.5 प्रकारच्या प्रदूषकांमध्ये इतर दिवसांपेक्षा 60 ते 70 टक्के वाढ होण्याची शक्यता असल्याने हवेच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो, असं 'सफर'तर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.
हेही वाचा