नवी मुंबईतील (navi mumbai) प्रकल्पग्रस्तांच्या १०२ दगडखाणी (stone quarries) पुन्हा सुरु करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यामुळे भूमिपुत्रांसह या दगडखाणीवर काम करणाऱ्या ४० हजार कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या उपजीविकेचा प्रश्नही सुटणार आहे.
नवी मुंबई शहरासाठी जागा संपादित केल्यानंतर सिडकोने भूमिपुत्रांना उपजीविकेचे साधन म्हणून दगडखाणींचे वाटप केले होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळे १०२ दगडखाणी मागील पाच वर्षांपासून बंद होत्या. या दगडखाणी बंद असल्याने ३५ ते ४० हजार लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला होता. या दगडखाणी सुरू करण्यासाठी प्रकल्पग्रस्त प्रयत्न करीत होते. मात्र त्यांची कोणतीही दखल घेण्यात आली नाही.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दगडखाणी मालक भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले. एकनाथ शिंदे यांनी सिडको आणि प्रकल्पग्रस्त दगडखाणी संदर्भातील अनेक प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी दगडखाणी मालकांशी बैठकही केली. या बैठकीत याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामुळेच लवकरच नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या १०२ दगडखाणी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
हा निर्णय घेतल्याने दगडखांणी संदर्भात असलेल्या सर्व घटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या ५ वर्षांपासून प्रतिक्षेत असलेले हे प्रकरण अखेर मार्गी लागले आहे. त्यामुळे सर्वांकडून त्यांचे आभार मानले जात आहे.
हेही वाचा -