मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये आज, बुधवारी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यातील पावसानंतर गेले दोन दिवस पुन्हा प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यात आता आणखी भर पडणार आहे.
मुंबई, पालघर येथे बुधवारी, तर पालघर येथे गुरुवारीही मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर गुरुवारी ठाणे आणि मुंबई येथे पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे.
रायगड आणि रत्नागिरी येथेही बुधवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, गुरुवारी हलक्या पावसाचा अंदाज आहे. सिंधुदुर्गात दोन दिवस फारसा पाऊस नसेल.
मुंबईमध्ये मंगळवारी सांताक्रूझ येथे ३३ अंश सेल्सिअस, तर कुलाबा येथे ३३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. मात्र वातावरणात आर्द्रता असल्याने तापमानाच्या तुलनेत अधिक उकाड्याची जाणीव मुंबईकरांनी अनुभवली. कुलाबा येथे मंगळवारी ७४ टक्के तर सांताक्रूझ येथे ६८ टक्के सापेक्ष आर्द्रता होती.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्याने राज्यात मागच्या काही दिवसांपासून वादळी पावसासह गारपीट होत आहे.
दरम्यान एप्रिलच्या शेवटीही पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. वादळी पाऊस आणि गारपीट होत असली तरी उन्हाचा चटका कायम असल्याने राज्यात उन्हाच्या झळा बसत आहेत.
मागच्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे राज्याचील हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.