कलाकारांनी फार संघर्षानं स्वत:ला सिद्ध केलेलं असतं. त्यामुळंच रील लाईफमधील भूमिका साकारताना एखाद्या क्षणी रीअल लाईफमधील आठवणींना उजाळा मिळतो आणि कलावंत भावूक होतात. अभिनेत्री चिन्मयी सुमित यांच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं.
चिन्मयी सुमितनं आपल्या बहारदार अभिनयशैलीच्या बळावर मराठी चित्रपटसृष्टीत आपलं मानाचं स्थान निर्माण केलं आहे. चिन्मयी सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू झालेल्या 'डॅा. बाबासाहेब आंबेडकर' या नवीन मालिकेत बाबासाहेबांच्या आईची म्हणजेच भीमाईची भूमिका साकारली आहे. या मालिकेत सागर देशमुख बाबासाहेबांच्या भूमिकेत झळकणार आहे, पण सध्या या मालिकेत बाल बाबासाहेब आणि त्यांच्या बालपणीचा काळ पहायला मिळत आहे. बालकलाकार अमृत गायकवाड ही भूमिका साकारत आहे. या मालिकेच्या शूटिंगच्या आठवणीनं चिन्मयी भावूक झाल्या.
प्रत्येक कलाकारासाठी एखादी भूमिका म्हणजे परकाया प्रवेश असतो. त्या भूमिकेत शिरल्याशिवाय प्रेक्षकांपर्यंत ती भूमिका प्रभावीपर्यंत पोहोचत नाही. भीमाईचं व्यक्तीमत्व अत्यंत प्रभावी आणि खंबीर होतं. बाबासाहेबांच्या लहानपणीच आजारपणामुळं भीमाई यांचं निधन झालं. सर्वात लहान लेकरू म्हणून भीवावर त्यांचा जीव होता. या मालिकेच्या सेटवरही असंच काहीसं चित्र होतं. आंबेडकरांच्या बालपणीची भूमिका साकारणाऱ्या अमृतनं चिन्मयीसोबत इतरांनाही खूप लळा लावला. भीमाईंच्या निधनाच्या चित्रीकरणानंतर चिन्मयी यांनीही मालिकेचा निरोप घेतला, पण छोटा भीवा, मालिकेतील सहकलाकारांसोबतच्या आठवणीनं मात्र त्या भावूक झाल्या. या कुटुंबात यापुढं आपण नसणार या जाणीवेनं त्यांची पावलं जड झाली होती.
या मालिकेविषयी चिन्मयी म्हणाल्या की, माझी आई औरंगाबाद इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात शिक्षिका होती. त्यामुळं लहानपणापासूनच माझ्यावर बाबासाहेबांच्या विचारांचे संस्कार झाले. घरात खूप पुस्तकं होती. शाळेच्या लायब्ररीतही मुक्त प्रवेश होता. त्यामुळं बालपणापासूनच वाचनाची गोडी लागली. आमच्या कुटुंबावर बाबासाहेबांच्या विचारांचा पगडा होता आणि आजही तो कायम आहे. त्यामुळंच या भूमिकेसाठी जेव्हा दशमी प्रोडक्शन्समधून विचारणा झाली, तेव्हा मी तातडीनं होकार दिला. महामानवाच्या आईची भूमिका साकारायला मिळणं ही माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट होती. अतिशय कणखर आणि स्वाभीमानी स्त्री असणाऱ्या भीमाई यांना मालिकेच्या रूपात भेटता आल्याचा आनंद आहे. या मालिकेचं कुटुंब माझ्या मनात कायम वसलेलं राहिल अशी भावना चिन्मयी यांनी व्यक्त केली.
'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेत पुढील भागांमध्ये लहान वयातच आईचं छत्र गमावलेल्या भीमाच्या मनाची घालमेल पाहायला मिळणार आहे. लहानग्या मुलांची होणारी परवड आणि घर सांभाळायला कुणीच नसल्यामुळं भीवाचे बाबा रामजी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतात. भीवाला मात्र दुसऱ्या आईचं येणं पटत नसतं. बयेची म्हणजे पहिल्या आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही, या मतावर तो ठाम असतो. आईचं जाणं आणि सावत्र आईचं येणं या प्रसंगांतून भीवाच्या लहानग्या मनावर कसा परिणाम होतो, त्याची कथा पुढं पहायला मिळणार आहे.
हेही वाचा-
ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक, अभिनेते गिरीश कर्नाड यांचं निधन
अबब! चरण-एनटीआरचे ४५ कोटींचे फाइट सिक्वेन्स