Advertisement

सात वर्षांनी एकत्र येणाऱ्या उमेश-प्रियाला 'आणि काय हवं'

हिंदी चित्रपटसृष्टीप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतही काही रिल लाईफ जोड्या रीअल लाईफमध्येही एकत्र आल्या आहेत. यापैकी एक असलेली प्रिया बापट आणि उमेश कामत ही रीअल लाईफ जोडी सात वर्षांनी रील लाईफमध्ये पुन्हा एकत्र दिसणार आहे.

सात वर्षांनी एकत्र येणाऱ्या उमेश-प्रियाला 'आणि काय हवं'
SHARES

हिंदी चित्रपटसृष्टीप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतही काही रिल लाईफ जोड्या रीअल लाईफमध्येही एकत्र आल्या आहेत. यापैकी एक असलेली प्रिया बापट आणि उमेश कामत ही रीअल लाईफ जोडी सात वर्षांनी रील लाईफमध्ये पुन्हा एकत्र दिसणार आहे.


आणि काय हवं

मराठी सिनेसृष्टीतील क्युट कपल म्हणून ओळखले जाणारे प्रिया बापट आणि उमेश कामत 'आणि काय हवं' या वेबसिरीजच्या माध्यमातून सात वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ऑफस्क्रिन आणि ऑनस्क्रिनही या दोघांची केमिस्ट्री उत्तमरित्या जुळून येत असल्याचं सर्वांनीच पाहिलं आहे. त्यामुळं या वेबसिरीजमधूनही ते प्रेक्षकांची मनं नक्कीच जिंकतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. या वेबसिरीजमध्ये प्रिया 'जुई'ची तर उमेश 'साकेत'ची व्यक्तिरेखा साकारत आहे. वैवाहिक जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सामोरं जात असतानाच ते दर दिवशी एकमेकांच्या नव्यानं प्रेमात पडत आहेत. 


थांबल्याचा फायदा

'आणि काय हवं' या वेबसिरीजमध्ये पुन्हा प्रियासोबत काम करण्याबाबत उमेश म्हणाला की, सात वर्षांपूर्वी आम्ही एकत्र काम केलं होतं. एक मालिका, एक व्यावसायिक नाटक आणि त्यानंतर 'टाईम प्लीज' हा चित्रपट. अशा विविध माध्यमांमधून प्रिया आणि मी प्रेक्षकांच्या भेटीला आलो. मात्र त्यानंतर बराच काळ आम्ही एकत्र काम केलं नाही. परंतु कालांतरानं आम्हालाही याची जाणीव झाली, की आपण एकत्र काम केलं पाहिजे. काही प्रोजेक्ट्सबाबत आम्हाला विचारणाही करण्यात आली. मात्र इतक्या वर्षांच्या कालावधीनंतर एकत्र पडद्यावर झळकण्यासाठी आम्हाला ते विषय तितकेसे भावले नाहीत. याच दरम्यान अनिष जोग आणि वरुण नार्वेकर यांनी या वेबसिरीजबद्दल आम्हाला विचारणा केली. त्यांची संकल्पना ऐकल्यानंतर, त्या क्षणी मनात आलं की, इतकी वर्षं थांबल्याचा निश्चितच फायदा झाला.


१६ जुलैपासून प्रसारीत 

लग्नानंतर घेतलेलं पाहिलं घर, पहिली गाडी, एकत्र साजरा केलेला पहिला सण अशा लग्नानंतर एकत्र केलेल्या अनेक 'पहिल्या' गोष्टींचं अप्रूप काही औरच! आणि या वेबसिरीजमध्ये हेच लग्नानंतरचे छोटे छोटे सुखद क्षण दाखवण्यात आले आहेत. ही वेबसिरीज बघताना नकळत प्रेक्षकांच्या आयुष्यातील अमूल्य आठवणींनाही उजाळा मिळेल असं सांगितलं जात आहे. 'मुरांबा' फेम वरूण नावेकर दिग्दर्शित, अनिष जोग, रणजित गुगळे निर्मित 'आणि काय हवं' ही सहा भागांची वेबसिरीज १६ जुलैपासून एमएक्स प्लेयरवर प्रसारीत होणार आहे.



हेही वाचा-

'स्वराज्य जननी जिजामाता'च्या रूपात अमृता पवार

कशासाठी, तर चाहत्यांच्या प्रेमासाठी - तेजश्री प्रधान




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा