शूट म्हटलं की, इनडोअर आणि आऊटडोअर असे दोन प्रकार येतात. बरेच दिवस एकाच सेटवर इनडोअर शूट करून कलाकार काहीसे कंटाळतात. त्यामुळेच जेव्हा एखादं आऊटडोअर शूट लागतं, तेव्हा सर्वांमध्ये एक नवा जोष संचारतो. कारण आऊटडोअरला शूटसोबत थोडी धमाल-मस्तीही करता येते. अशीच धमाल ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेतील सिद्धार्थ आणि मनवा यांनी केली.
‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेच्या आऊटडोअर शूटमध्ये एक गंमत आहे. हे शूट मुंबईच्या रस्त्यांवर झालं असलं तरी ते कोणालाही ठाऊक नव्हतं. म्हणजे हे शूट करताना कोणत्याही प्रकारचा गाजावाजा नव्हता की, मोठमोठ्या व्हॅनिटी व्हॅन्स नव्हत्या. भर रस्त्यात गो-प्रो कॅमेऱ्याच्या मदतीने हे चित्रीकरण केलं गेलं. कोणालाही त्रास न देता, अतिशय साधेपणानं हे शूट करण्यात आलं असलं तरी ज्यांच्यावर सीन चित्रीत करण्यात आले त्या सिद्धार्थ आणि मनवाने मात्र हे शूट खूपच एन्जाय केलं.
गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट, गिरगाव चौपाटी आणि महालक्ष्मी मंदिर अशा मुंबईतील प्रेक्षणीय स्थळांवर हे चित्रीकरण केलं गेलं. या चित्रीकरणात सिद्धार्थ आणि मनवा यांनी नरिमन पॉईंटच्या कट्टयावर उभं राहून चालणं, समुद्र पाहत तिकडच्या फेरीवाल्याकडून चहा पिणं, तिथे एकमेकांचं फोटोशूट करणं, महालक्ष्मीच्या देवळात ओटी भरणं, गेट वे ऑफ इंडियाला एखाद्या नॉर्मल जोडप्याप्रमाणे फिरणं असं बरंच काही केलं.
शूट करताना लागणाऱ्या सगळ्या महत्वाच्या गोष्टींची काळजी घेण्यात आली आणि त्याचबरोबर या शूटचा कोणालाही त्रास नाही होणार हे सुद्धा पहिलं गेलं. झी युवावर सुरू असलेल्या ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत सिद्धार्थची भूमिका सिद्धार्थ बोडके आणि मनवाची व्यक्तिरेखा तितिक्षा तावडे साकारत आहे. सध्या या मालिकेत राजवीर आणि मनवा यांचं लग्न झालं असून, या दोघांमधील गुलाबी क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याचं काम सुरू आहे.
हेही वाचा -
‘भाडिपा’च्या निशाण्यावर राजकारणी!
मराठमोळ्या सावनीचं तमिळभाषी व्हॅलेंटाईन गिफ्ट !