मुंबईच्या लालबाग परिसरातील 'चिंचपोकळीचा चिंतामणी' या नावानं प्रसिद्ध असलेल्या चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा ९९ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. पुढच्या वर्षी हे मंडळ शतक महोत्सवी वर्षांत पदार्पण करणार आहे. यानिमित्त दादरमधील शिवाजी मंदीर येथे स्वप्नं शंभरीचे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी मंडळाच्या नव्या बोधचिन्हाचं (लोगो) अनावरण करण्यात आलं. यावेळी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर, श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर, अभिनेत्री स्पृहा जोशी, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष मधू चव्हाण, आणि मुर्तीकार रेश्मा खातू अादी उपस्थितीत होते.
चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं नवं बोधचिन्हं सुलेखनकार अच्युत पालव यांनी रेखाटलं आहे. अगोदर 'चि' या अक्षरात बोधचिन्ह रेखाटलेलं होतं. या बोधचिन्हाला संपूर्ण राज्यभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. परंतु शतक महोत्सवी वर्षांच्या उंबरठ्यावर असताना शतक महोत्सवी बोधचिन्हाची संकल्पना जन्माला आली. त्यानुसार चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ हे शिस्तीसाठी मैलाचा दगड ठरलेलं आहे. त्यामुळं प्रतिकात्मक मैलाच्या दगडाचा वापर बोधचिन्हात करण्यात आला आहे, असं अच्युत पालव यांनी सांगितलं.
चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे महाराष्ट्रातील मुर्तीकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शतक महोत्सवाचा चिंतामणी कसा असेल या दृष्टीने "चिंतामणी शतक" ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. पुढील वर्षी माघी गणेशोत्सवाच्या अगोदर ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत मुर्तीकारांना मंडळानं दिलेल्या आकारात शाडू मातीपासून बाप्पाची मूर्ती बनवायची आहे.
१९२० साली चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे १९२० सालापासून आतापर्यंत या मंडळानं सांस्कृतीक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा केला आहे. मागील ९९ व्या वर्षात अनेत चढ-उतार या मंडळानं पाहिले आहेत. सध्या अनेक मंडळं प्रसिद्धीसाठी राजकीय नेते आणि अभिनेत्यांची मदत घेतात. मात्र, हे मंडळ मागील ९९ वर्षांपासून सांस्कृतीक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करत आहे.
- वासुदेव सावंत, सचिव, चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
हेही वाचा -
दहीहंडी समन्वयक समितीचा राम कदमांच्या दहीहंडीवर बहिष्कार
दहीहंडीदरम्यान नियमांचं उल्लंघन, राज्य सरकारविरोधात अवमान याचिका