नव्या वर्षाला सुरुवात झाल्यावर पहिल्याच महिन्यात १५ जानेवारीला मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. भारतामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या नावानं हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी, संक्रांत व किंक्रांत अशी नावे आहेत. आज आम्ही तुम्हाला मकर संक्रांतीचं महत्त्व पटवून देणारे ५ मुद्दे सांगणार आहोत.
मकर संक्रांतीला ज्याप्रमाणे अध्यात्मिक महत्त्व आहे, तेवढचं शास्त्रीय महत्त्वही आहे. हा दिवस येण्याआधी रात्र मोठी असते तर दिवस लहान असतो. मात्र या दिवसानंतर दिवस आणि रात्र समान होतात.
मकर संक्रांतीला तिळाचे विशेष महत्त्व असते. या दिवसात प्रचंड प्रमाणात थंडी असते. तिळाचे सेवन केल्यानं शरीर उष्ण राहते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ खाण्याची पद्धत सुरू झाली. तसंच तिळापासून विविध पदार्थ बनवण्यास सुरुवात झाली. फक्त तीळच नाही तर बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी, वांगी, सोलाणे,पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात केला जातो.
मकर संक्रांत हा सण 'पतंगांचा सण' म्हणून ओळखला जातो. परंतु, हा सण साजरा करण्यामागे शास्त्रीय कारण खूपच कमी लोकांना माहीत आहे. सकाळी उठून पतंग उडवल्यानं शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. तसंच कोवळ्या उन्हात पतंग उडवल्यानं शरीराला 'व्हिटामिन डी'ही मिळतं. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवायची प्रथा पडली.
संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना आणि लहान मुलांना तिळगुळ वाटतात. तसंच स्त्रिया या दिवशी 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करतात. रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदीकुंकवाचा शेवटचा दिवस असतो. याचा हेतू म्हणजे जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे.
बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरन्हाण करतात. त्यांना काळे कपडे आणि हलव्याचे दागिने घालतात. चुरमुरे, बोरे, हरभरे, उसाचे तुकडे, हलवा असं मिश्रण लहान मुलांच्या डोक्यावर ओततात. अलीकडे यामधे गोळ्या, छोटी बिस्किटे घालण्याची हौसही दिसते.