गणपती विसर्जनाच्या दिवशी समुद्रावर गर्दी होऊ नये यासाठी मुंबईत कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. गिरगाव चौपाटी, वरळी, दादर, वांद्रे, खार, सात बंगला, जुहू, वेसावे, गोराई, मढ, मार्वे या चौपाट्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यंदा गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका असल्याने पालिकेने कृत्रिम तलावावर भर दिला आहे. मुंबई महापालिकेने १६८ कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले आहेत.
मुंबई महापालिकेने विभागवार कृत्रिम तलाव उभारले आहेत. प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत १५ ते २०, तर काही ठिकाणी ३० ते ३५ कृत्रिम तलाव उभारले आहेत. त्यापैकी सर्वाधिक कृत्रिम तलाव अंधेरी पूर्व व भांडुप येथे उभारण्यात आले आहेत. अंधेरी के पूर्व विभागात ३५ कृत्रिम तलाव उभारले आहेत. तर सर्वात कमी तलाव मुलुंड, गोवंडी मानखुर्द, चेंबूर, गिरगांव आदी विभागात आहेत.
कृत्रिम तलावालगत राहणाऱ्या भाविकांना नैसर्गिक विसर्जनस्थळांवर जाण्यास मनाई असल्याने संबंधित भागातील कृत्रिम तलावाचा वापर भाविकांनी करणे बंधनकारक आहे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
पालिकेच्या प्रत्येक विभागांतर्गत कृत्रिम तलाव तसेच सात ते आठ गणेशमूर्ती संकलन केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. त्याची माहिती तसेच कृत्रिम तलावांची माहिती पत्ता व गुगल लोकेशनसह महापालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कोरोनाचा प्रसार होईल म्हणून यावर्षी साधे पणाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मुंबईत गणेशोत्सवादरम्यान दोन लाख ३० हजार मूतीची प्रतिष्ठापना केली जाते. त्यापैकी सुमारे ३४ हजार मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात केलं जातं.
दादर, माहीम, धारावीकरांसाठी 'फिरता कृत्रिम तलाव आपल्या दारी'
वसईत विसर्जनासाठी 'तलाव आपल्या घरी' संकल्पना