मुंबईसह राज्यभरात काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं राज्यातील अनेक भागांत पुरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत झालं. पुरस्थिती निर्माण झाल्यानं अनेकांची घरं पाण्याखाली होती. घरातील सर्व राशन-पाण्याचं नुकसान झालं. अशातच येत्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला असून, अनेक मूर्तीकांरांनी बाप्पाची मूर्ती घडविण्याच्या कामाला सुरूवातही केली आहे. पण या पावसामुळं निर्माण झालेल्या पुराचा या फटका मूर्तीकारांनाही चांगलाच बसला आहे.
मुसळधार पावसानं संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्राला झोडपलं. परिणामी येथील जिल्ह्यातील गणेश मूर्तिकारांचेदेखील मोठे नुकसान झालं. त्यामुळं या मूर्तीकारांना दिलासा देण्यासाठी ज्यांच्या मातीच्या गणेशमूर्तीचं महापुरात नुकसान झालं आहे त्या मूर्तिकारांना मूर्ती दिल्या जातील, अशी माहिती श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटनेनं दिली. पहिल्या टप्प्यात कोकणातील गणेश मूर्तिकारांना मदत केली जाणार असल्याचंही श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.
'मागील काही दिवसांत महाराष्ट्र राज्यामधील कोकण, महाड, चिपळूण भागांमध्ये अतिवृष्टी होऊन तेथील मूर्तिकारांचे नुकसान झाले आहे. त्यांचे नुकसान १०० टक्के भरून देणं अशक्य आहे. महाराष्ट्रातील श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटना म्हणून त्यांना मदत करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. तरी मुंबई व उपनगरातील गणेश मूर्तिकार आणि संघटनेतील मूर्तिकारांना ही विनंती करीत आहोत की पूरग्रस्त मूर्तिकार बांधवांसाठी फूल ना फुलाची पाकळी म्हणून गणेशमूर्तीच्या मदतीचा उपक्रम आपली संघटना राबवित आहे. आपण मूर्तिकार जरी पैशांनी सक्षम नसलो तरी मानाने नक्कीच सक्षम आहोत. ज्या पद्धतीने आपण गणपतीची मूर्ती घडवतो त्याप्रमाणे पूरग्रस्त मूर्तिकारांना पुन्हा उभारी देण्याचे काम आपल्याला करायचे आहे; तरी प्रत्येक मूर्तिकाराने खारीचा वाटा उचलावा', असं श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटनेने मुंबई आणि उपनगरांमधील सर्व गणेश मूर्तिकारांना आवाहन केले आहे.
हेही वाचा