Advertisement

राज्यात स्वाईन फ्लूमुळे 199 रुग्णांचा मृत्यू - दिपक सावंत


राज्यात स्वाईन फ्लूमुळे 199 रुग्णांचा मृत्यू - दिपक सावंत
SHARES

राज्यात हवामानातील बदलामुळे स्वाईन फ्लू विषाणूचा प्रार्दुभाव वाढला असून राज्यात जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत सुमारे 199 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितलं. नागरिकांनी सर्दी, ताप, घसादुखीचा आजार अंगावर काढू नये. औषधोपचारानंतर 24 तासात बरं वाटलं नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅमिफ्लूच्या गोळ्या सुरू कराव्यात, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केलं आहे.


आरोग्यमंत्र्यांचा सल्ला

राज्यात ठिकठिकाणी स्वाईन फ्लू संशयित 16 हजार रुग्ण दाखल असून त्यांच्यावर खासगी तसेच महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्य शासनाने साथीच्या रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी नेमलेल्या समितीची गेल्या आठवड्यात बैठक झाली. यावेळी व्हेंटिलेटरवर असलेल्या स्वाईन फ्लूच्या रुग्णांवरील उपचारांमध्ये एकसुत्रीपणा यावा, यासाठी औषधोपचारांचा प्रोटोकॉल करण्याबाबत चर्चा झाली. पुढील दोन दिवसांमध्ये हा प्रोटोकॉल राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांना तसंच महापालिकेच्या रुग्णालयांना पाठवण्यात येईल. त्यानुसार त्यांनी स्वाईन फ्लू बाधित रुग्णांवर उपचार करणं आवश्यक आहे.


'आजार अंगावर काढू नका'

राज्यात खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालेल्यांचं मृत्यू अहवाल (डेथ ऑडिट रिपोर्ट) प्राप्त होत आहे. या अहवालानुसार औषधोपचारास विलंब हे मृत्यूचं प्रमुख कारण असून काही रुग्णांनी स्वत: सर्दी, तापावर गोळ्या, औषधं घेऊन आजार अंगावर काढला आहे. तर आठवड्याभरानंतरही प्रकृतीत फरक न पडल्याने त्यांनी डॉक्टरांकडे धाव घेतल्याचं दिसून येतं. अशा परिस्थ्‍िातीत स्वाईन फ्लूवरील उपचार वेळेत न सुरू झाल्याने मृतांची संख्या वाढली आहे. अशा परिस्थितीत सर्दी, ताप, घसादुखी 24 तासाच्या आत बरी न झाल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅमी फ्लू गोळ्यांचा डोस सुरू करावा. कुठल्याही परिस्थितीत आजार अंगावर काढू नका, असं आवाहन डॉ. सावंत यांनी केला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा