राज्यातील कोरोनाग्रस्तांची (coronavirus) संख्या वाढून मंगळवारी दुपारपर्यंत २३० वर जाऊन पोहोचली आहे. या वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येकडे पाहून कोरोना व्हायरस आता कम्युनिटी ट्रान्समिशनच्या दिशेने वाटचाल करत असल्याची भीती व्यक्त होत आहे. परंतु अजून तरी कोरोनाचा संसर्ग (covid-19) समाजात झालेला नसल्याचा खुलासा केंद्रीय आरोग्य विभागाने केला आहे.
मुंबईत कोरोनाबाधित ५ नवे तर पुण्यातील १ रुग्ण आढळून आल्यानंतर हा आकडा २३० वर पोहोचला आहे. त्याआधी दिवसाच्या सुरूवातीलाच मुंबईत १ आणि पुणे तसंच बुलडाण्यातील प्रत्येकी २ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने रुग्णसंख्या २२५ वर गेली होती.
आज राज्यात 2 करोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाले. एकाचा मुंबईतील खाजगी रुग्णालयात तर एकाचा पुण्यातील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना हृदयरोग,मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. राज्यातील करोना बाधित मृत्यूची संख्या आता 10 झाली आहे. #CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 30, 2020
त्याचसोबत राज्यातील आतापर्यंत ३९ कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. त्याची सविस्तर आकडेवारी अशी : मुंबई-१४, पुणे-७, पिंपरी चिंचवड-९, यवतमाळ-३, अहमदनगर-१, नागपूर- ४, औरंगाबाद-१.सध्या राज्यात १७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मुंबईतील काेरोनाबाधितांचा आकडा देखील ९३ वर गेल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. शहरात ठिकठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. वरळीतील कोळीवाड्यात ४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यावर संपूर्ण कोळीवाडा परिसर पोलिसांनी सील केला. त्यापाठोपाठ कांदिवलीतील लोखंडवाला आणि गोरेगाव पूर्वेकडील बिंबीसार नगरमध्येही कोरोनाबाधित आढळल्याने हे दोन्ही परिसर सील करून तिथं जंतुनाशक फवारणी करण्यात आली.