राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येनं ४ हजाराचा आकडा पार केला आहे. राज्यात रविवारी कोरोनाबाधित ५५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ४२०० वर पोहोचली आहे. यामधील १४२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५०७ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ३४७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
रविवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७२ हजार ०२३ नमुन्यांपैकी ६७ हजार ६७३ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत. तर ४२०० जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८७ हजार २५४ नागरिक होम क्वारंटाइनमध्ये असून ६,७४३ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात १२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मुंबई येथील ६ आणि मालेगाव येथील ४ तर, एक मृत्यू सोलापूर महापालिका क्षेत्र आणि एक मृत्यू अहमदनगरमधील जामखेड येथील आहे.
मृतांमध्ये ४ पुरुष , तर ८ महिला आहेत. रविवारी झालेल्या १२ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६ रुग्ण आहेत, तर ५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे. मालेगाव येथील मृत्युमुखी पडलेल्या ४ रुग्णांना इतर काही आजार आहेत का याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. उर्वरित ८ जणांपैकी ६ रुग्णांमध्ये ( ७५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. करोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २२३ झाली आहे.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा रविवारपर्यंतचा तपशील