मुंबईत दररोज सरासरी १४ हजार चाचण्या करण्याचे लक्ष्य मुंबई महापालिकेनं ठेवलं आहे. मुंबईत टप्प्याटप्प्यानं अनलॉक होत असून, अनेक सुविधा सुरू होत आहेत. कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आलेली वाढ आणि गणेशोत्सवानिमित्त भाविकांनी केलेली गर्दी अशा विविध कारणांमुळं मुंबईतील वर्दळ वाढली आहे. त्यामुळं महापालिकेनं दररोज चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी पालिका आयुक्त यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.
मुंबईत काहीच दिवसांपूर्वी गणेशोत्सव पार पडला. या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वर्दळ वाढू लागली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारनं कार्यालयांमध्ये ३० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला परवानगी दिली आहे. कार्यालयांपर्यंत पोहोचण्याबाबत कोणतेही नियोजन नसल्यामुळं अनेक कर्मचारी स्वत:च्या खासगी वाहनाने कार्यालयात पोहोचू लागले आहे. त्यामुळं रस्ते वाहतुकीवर प्रचंड ताण येऊन रस्त्यांवरही वर्दळ वाढू लागली आहे. परंतु, सामाजिक अंतराच्या नियमांचा उडणारा बोजवारा, मुखपट्टय़ांचा अयोग्य पद्धतीने वापर आदी विविध कारणांमुळं कोरोना संसर्गाचा प्रसार वाढण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
या सर्वाचा विचार केला असता महापालिकेनं मुंबईमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेनं मे-जूनमध्ये प्रतिदिन ४ हजार चाचण्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी प्रतिजन चाचण्यांनाही सुरुवात झाली. परिणामी, प्रतिदिन सुमारे ६,५०० चाचण्या करण्यात येत होत्या. महापालिका प्रशासनानं जुलैमध्ये चाचणीसाठी डॉक्टरांच्या शिफारसपत्राची अट काढून टाकली. तसंच २३ प्रयोगशाळांच्या माध्यमातून घरी जाऊन करोना चाचण्या करण्याची मुभा दिली.
या महिन्यात दररोज ७,६१९ चाचण्या करणं शक्य झालं. महापालिकेनं ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात चाचण्यांच्या प्रमाणात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दररोज ९ ते १० हजार चाचण्यांचं लक्ष्य ठरविण्यात आलं. या काळात एका दिवशी ११ हजार ८६१ चाचण्या करण्यात आल्या होत्या. आता सप्टेंबरमध्ये दर दिवशी १० ते १४ हजार चाचण्यांचं लक्ष्य पालिकेनं ठेवलं आहे.
हेही वाचा -
राज्यात आज १६ हजार ४२९ नवे रुग्ण, ४२३ जणांचा दिवसभरात मृत्यू
लढाई कोरोनाशी: कोव्हिडचा हल्ला!