महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ५० हजाराच्या वर गेली आहे. एकट्या मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. सरकारनं लाखो लोकांना केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन केलं आहे. यामुळे मुंबईत कोविड रुग्णालयात रुग्णांसाठी तयार केलेले सर्व बेड भरले आहेत.
कोरोना रुग्णांचा आकडा पाहता रुग्णालयात, आयसोलेशन सेंटर, क्वारंटाईन केंद्रात बेड्सची संख्या अपुरी पडण्याची शक्यता आहे. एकाच वेळी इतक्या बेड्सची मागणी पूर्ण करण्यासाठी बीएमसी आता पुठ्ठ्याचे बनलेले मजबूत बेड मोठमोठ्या क्वारंटाइन सेंटर आणि आयसोलेशन वार्डमध्ये स्थापित करत आहे. हो...हो.... पुठ्ठ्यांपासून बनवलेले बेड्स... तुम्ही योग्य वाचलंत. मुंबईतील एका कंपनीनं चक्क पुठ्ठ्यापासून बनवलेले बेड्स तयार केले आहेत.
आता तुम्ही म्हणाल, पुठ्ठ्याचे बेड्य? किती टिकतील? सुरक्षित आहेत का? असले तरी महाग असतील आणि पाणी लागलं तर किती टिकतील? असे एक ना अनेक प्रश्न डोक्यात आले असतील. याच संदर्भात आम्ही तेजस कामदार यांचाशी बोललो. तेजस कामदार हे या कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
मुंबईच्या जायना पॅकेजिंग नावाच्या कंपनीनं पुठ्ठ्यानं बनवलेले हे बेड तयार केले आहेत. ३० वर्षांपासून ही कंपनी कार्डबोर्डपासून पॅकिंग आणि फर्निचर निर्मिती करतेय. पण मार्चमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. तेव्हा केवळ २ दिवसांच्या प्रयत्नात कंपनीनं बेड्स तयार केले. सुरुवातीला त्याचे उत्पादन कमी होते, परंतु आता पालिकेसह अनेक खासगी रुग्णालयांकडून ऑर्डर मिळाल्यानंतर उत्पादनाची गती वाढवण्यात आली.
पुठ्ठ्यापासून बनवलेले हे बेड्स खूपच मजबूत आहेत. जवळपास ४०० किलोपर्यंतचे वजन सहजपणे झेलू शकते. आतापर्यंत धारावी, नायर, घाटकोपर इथलं हिंदू सभा या रुग्णालयात या बेड्सचा पुरवठा करण्यात आला आहे. याशिवाय गुजरात, इंदौर, भोपाळ आणि भारताबाहेर देखील याची मागणी आहे.
तेजस कामदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जायना पॅकेजिंग
पालिका रुग्णालयात आतापर्यंत ४००-५०० बेड्स कंपनीतर्फे पुरवण्यात आले आहेत. तर वितरक कंपनीनं आतापर्यंत अनेक बेड्स रुग्णालयांमध्ये पुरवले आहेत. कुर्लामध्ये या कंपनीचे बेड्स बनतात. काही मिनिटांमध्ये बेड्स असेंबल करता येतात. त्यामुळे २ मिनिटात बेड लावून वापरता येऊ शकतो. याशिवाय इकोफ्रेंडली असल्यानं वापरून झाल्यावर टाकण्यास देखील काही समस्या येत नाहीत.
लॉकडाऊन लागू असल्यानं सध्या त्यांचाकडे कामगारांची कमतरता आहे. पण असं असलं तरी बेड्सची आवश्यक्ता असल्यानं त्यांनी कामच चालूच ठेवलं आहे.
आमच्याकडे बनवण्यात येणारे बेड्स किंवा इतर सामान मशीननं बनवले जातात. सध्या कामगारांची कमतरता आहे. पण मशीनरीमुळे बरेच काम सोपे झाले आहे. बरेच कामगार गावी गेले. बरेच कामगार क्वारंटाईन झाले. आमच्याकडे केवळ १० जण काम करत आहेत. पण तरी आम्ही प्रोडक्शन सुरू ठेवलं आहे. कारण बेड्सची मागणी वाढली तर आम्ही ते पुरवू शकू.
तेजस कामदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जायना पॅकेजिंग
बेड पुठ्ठ्याचा (कार्डबोर्ड) बनलेला असल्यामुळे त्याला पाण्यापासून दूर ठेवावा. पाण्याचे थेंब किंवा कमी पाण्याचा यावर जास्त परिणाम होणार नाही. पण जास्त वेळ पाण्यात राहिल्यास फरक पडू शकतो. याशिवाय कार्डबोर्डपासून बनल्यानं आणि स्वस्त असल्यामुळे, रुग्णालये एक वेळ वापरानंतर त्याला नष्ट देखील करू शकतात, असंही तेजस कामदार यांनी स्पष्ट केलं.
हरेश मेहता यांची ही संकल्पना आहे. गेली ३० वर्ष ते पुठ्ठ्यापासून साहित्य तयार करण्याचे काम करत आहोत. ते स्वत:च्या घरात देखील असेच बनवलेले बेड्स वापरतात. ३० वर्षांपासून ते कार्डबोर्डपासून फर्निचर बनवत आहेत. पण आता बेड्सची आवश्कक्ता असल्यानं त्यांनी बेड्सचं उत्पादन वाढवलं आहे.
हरेश मेहता यांनी जगातील अनेक देशांतून या बेडच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. पण आधी देशाची गरज पूर्ण करतील आणि नंतर जगातील इतर कोणत्याही देशात याचा पुरवठा करणार आहेत. हरेश यांची कंपनी दरमहा ५० हजार बेडची निर्मिती करीत आहे.
हेही वाचा