आल्हाददायक पावसात मनसोक्त भिजायला कुणाला आवडणार नाही? पण पाऊस जरी असला तरी त्यातून उद्भवणारे आजार मात्र त्रासदायक ठरतात. पावसाळ्यात त्वचेच्या बाहेरील आणि आतील स्तरांची आर्द्रता कमी होते. यामुळे त्वचा शुष्क होते.
यामुळे पावसाच्या पाण्याने अनेकांना त्वचा संबंधित आजार होतात.
पावसाळ्यात महापालिका रुग्णालयात दररोज उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांपैकी किमान ६० टक्के हे त्वचारोगाचे रुग्ण असतात. त्वचारोगावर कोणते आणि त्यावर कशाप्रकारे उपचार करावेत याबद्दल जे.जे. रुग्णालयातील त्वचारोग तज्ञ डॉ. रत्नाकर कामत यांनी माहिती दिली.
मुंबईच्या पावसात दमटपणा असल्याने पाऊस थांबल्यानंतर घाम येतो. या घामाचे रूपांतर उबाळ आणि घामोळ्यामध्ये होतं. पावसाळ्यात रस्त्यावर साचून राहिलेल्या पाण्यात किंवा चिखलात पाय गेल्यास पायांच्या बोटांमध्ये चिखल्या होण्याची शक्यता असते. यापासून वाचण्यासाठी बाहेरून आल्यानंतर गरम पाण्याने हात पाय धुतल्यानंतर "डस्टिंग पावडर" चा उपयोग करावा. डस्टिंग पावडर त्वचा कोरडी ठेवण्यास मदत करते, यामुळे खाज, गजकर्ण तसेच चिखल्या सारखे रोग बरे होतात.
माईल्ड साबणाचा प्रयोग या दिवसांत खूपच फायदेशीर ठरतो. सोप फ्री क्लिंजरही बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमची त्वचा शुष्क पडणार नाही. मृत त्वचेला हटवण्यासाठी आठवड्यातून एकदा स्क्रबचा वापर करा.
त्वचेची कोमलता कायम राखण्यासाठी लोशन बेस्ड मॉइश्चरायजरचा वापर करा. मेकअप कमीच करा. गरज असेलच तर वॉटरप्रूफ मेकअपचा वापर करा. पायाच्या बोटांमध्ये अॅन्टी फंगल पावडर टाका.
आजच्या तरुणाईला फॅशनेबल कपडे परिधान करण्याची सवय आहे, त्यात डेनिम हे त्यांचा आवडीचा प्रकार! पण जर पावसात डेनिमचे जीन्स किंवा कपडे घातल्यास पाण्यामुळे ते शरीराला चिकटतात परिणामी शरीराला खाज येते, आणि असे कपडे लवकर वाळत नाहीत. पावसाळ्यात डेनिम ऐवजी सुती किंवा कॉटनच्या कपड्यांचा वापर करावा. वापरासाठी हलके आणि लवकर वाळणारे हे कपडे पावसाच्या पाण्याने खाज किंवा गजकर्ण होण्यापासून बचाव करतात.
हेही वाचा-
घरातील स्वच्छता, शारीरिक दुर्बलतेवर होणार पाहणी