'बर्फी' या सिनेमातील प्रियांका चोप्राने साकारलेली झिलमिल आणि 'माय नेम इज खान' सिनेमात वारंवार 'आय अॅम नॉट अ टेररिस्ट' म्हणणारा शाहरुख खान आपल्या सर्वांनाच आठवत असेल. आत्ममग्नता अर्थात ऑटिझम हा आजार झालेली ही दोन्ही पात्र आपल्या लक्षात राहिली. किंबहुना या पात्रांविषयी सिनेमा बघताना आपल्याला वाईटही वाटते. मात्र खऱ्या आयुष्यात जेव्हा अशा रुग्णांशी लोकांचा सामना होतो, तेव्हा त्यांच्याकडे बघण्याची नजर अनेकदा बदललेली असते.
लहान मुलांमध्ये वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत या आजाराची लक्षणे दिसून येतात. या आजारात लहान मुलांमध्ये भावना व्यक्त करण्याच्या आणि संवाद साधण्याच्या क्षमतेचा विकास होत नाही.
ऑटीझम हा आजार झालेल्या मुलांकडे बघण्याचा आई-वडील आणि समाज या दोघांचा दृष्टीकोन कसा असावा, यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे जाणीव जागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने आई-वडील आणि मुलं उपस्थित होते. या कार्यक्रमात ऑटिझम झालेल्या मुलांसोबत कसे वागावे? त्यांना कशा पद्धतीची वागणूक द्यावी? याबाबत काही शिक्षकांनी पालकांना शिकवले आणि आपले काही अनुभव ही शेअर केले.
आई-वडिलांवर अशा मुलांना सांभाळताना खूप ताण येतो. पण, त्यांनी नेहमी हसत राहिले पाहिजे. जर, सौम्य प्रकारचा ऑटिझम असेल तर, ते मूल लवकर बरं होतं. ऑटिझम या आजारावर गोळ्यांनी परिणाम होत नाही.
ऑटिझमसाठी काही संस्था काम करतात. ज्या अशा मुलांना कसं वागावं? कसं बोलावं हे शिकवतात. त्यांचे काही ग्रुप्स असतात. जी गेली अनेक वर्ष अशा मुलांसाठी काम करत आहेत.
- पी. एस. बुर्डे, जनरल सेक्रेटरी, परिवार-पालक संस्था, राष्ट्रीय महासंघ
आई-वडिलांना ऑटिझम झालेल्या मुलांना हाताळणं खूप कठीण होतं. मुळात आधी आपल्याला असं बाळ झालं आहे हे स्वीकारणंच आई-वडिलांना कठीण जातं. त्यामुळे अशा आई-वडिलांनी आपल्या मुलाला आधी स्वीकारण्याची गरज असते. आणि आपल्या बाळावर विश्वास ठेवत त्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करायला पाहिजेत.
- पारुल कुमठा, अध्यक्ष, फोरम फॉर ऑटिझम
ऑटिझम झालेली मुलं वेडी नसतात. त्यांच्यात काही अशी लक्षणे असतात, जी लहानपणापासून त्यांच्या आई-वडिलांना कळतात. पण, अशा मुलांना आई-वडील स्वीकारायला खूप उशीर लावतात. परिणामी, अशा मुलांचा विकास व्हायला फार काळ जातो. त्यामुळे अशा मुलांच्या आई-वडिलांनी आधी त्यांचा मनापासून स्वीकार केला पाहिजे आणि नंतर समाजाने. पण खरंच आपल्या समाजाचा अशा मुलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललाय का हाच खरा प्रश्न आहे.