एखादा आजार झाल्यानंतर त्याची तीव्रता जोपर्यंत वाढत नाही, तोपर्यंत आपण त्याकडे लक्ष देत नाही. असंच काहीसं आपल्या शरीरातील सांध्यांचं आहे. या सांध्यांच्या जोरावर आपण आपल्या सर्व दैनंदिन गोष्टी करत असतो. पण, आपण कधीच त्यांची काळजी घेत नाही.
12 ऑक्टोबर हा दिवस जागतिक सांधेदुखी दिन म्हणून पाळला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, विकसीत देशांमध्ये विकलांगत्वास कारणीभूत असलेल्या पहिल्या १० आजारांमध्ये सांधेदुखीचा क्रमांक आहे.
जगभरातील ६० वर्षांवरील जवळपास १३ टक्के पुरुष आणि २० टक्के स्त्रियांमध्ये सांधेदुखीची लक्षणं आढळून आलेली आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, सांधेदुखीने त्रस्त जवळपास ८० टक्के व्यक्तींच्या हालचालींवर मर्यादा येतात. तर, २५ टक्के व्यक्तींना नित्यनेमाच्या क्रिया करतानाही त्रास होतो. महिला घेत असलेल्या गर्भनिरोधक गोळ्या (हॉर्मोनल घटक) यामुळे या विकाराची सुरुवात लांबते. धुम्रपानामुळे आणि बैठ्या जीवनशैलीमुळेही हा आजार जडू शकतो.
संधिवात म्हणजे ‘आर्थ्रराइटिस’...हा आजार आता वेगाने वाढू लागला आहे. संधिवाताच्या सर्वाधिक आढळणाऱ्या प्रकारांपैकी ऱ्ह्युमेटॉईड आर्थ्रराइटिस हा प्रकार...हा प्रकार ऑस्टिओपोरोसिस आणि गाऊट या प्रकारांपाठोपाठ आढळतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, संधिवाताच्या या प्रकाराने जगातील १ ते १.५ टक्के लोकसंख्या त्रस्त आहे. याचा अर्थ भारतातील तब्बल १८ कोटी नागरिक या आजाराने त्रस्त आहेत.
- डॉ. दीप्ती पटेल, सांधेदुखी तज्ञ, वोक्हार्ट हॉस्पिटल
ऱ्ह्युमेटॉईड आर्थ्रराइटिस हा रोग प्रतिकारशक्तीचा एक विकार असून ज्यात शरीर आपल्याच सांध्यांवर आक्रमण करायला सुरूवात करतं. यामुळे सांधे आणि क्वचित हृदयालाही इजा होऊ शकते. आनुवंशिकता, जीवनशैली यांच्यासह हॉर्मोन्सही याला कारण असू शकतात. आता तर चाळीशीतही हा आजार होऊ लागला आहे.
तरुणांमध्ये वाढलेला स्थूलपणा पुरुषांना होणाऱ्या सांधेदुखीचं कारण असू शकतं. याशिवाय, आरोग्याला हानिकारक असलेल्या आहाराच्या सेवनामुळे कार्टिलेजच्या निर्मितीकरीता आणि निरोगी हाडे, सांधे, लीगामेण्ट्स आणि रक्तवाहिन्या यांच्या आरोग्याकरिता महत्त्वपूर्ण असलेली व्हिटॅमिन डी आणि बी ६, फॉलिक अॅटसिड, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, झिक आणि कॉपर यांसारख्या सूक्ष्म पोषणद्रव्यांच्या शरीरातील अभावानेही हा आजार होऊ शकतो.
ओस्टिओआर्थरायटीस हा अनुवांशिकही असू शकतो. तो बाळंतपणामुळे, दुखापतीमुळे किंवा कायम उंच टाचांच्या चपला वापरल्यानेही होऊ शकतो.
भारतातील बहुसंख्य व्यक्ती ओस्टिओआर्थरायटीसने पीडित असल्या तरी या आजाराबद्दल म्हणावी तितकी जागरूकता नाही. उशिरा झालेले निदान आणि उपाययोजना यामुळे परिस्थिती अजून गंभीर होऊ शकते.
रोजच्या जीवनशैलीत व्यायाम करणे आणि निरोगी आहार घेणे हे बदल सांधेदुखीला दूर ठेऊ शकतात. शिवाय, काही वेळेस फिजिओथेरपीची ही मदत होते.
हेही वाचा -
ऑफिसमध्येही राहायचंय फिट, तर वाचा 'या' ८ टिप्स !
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)