राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाचे प्रमाण आणि साखळी खंडित करण्यासाठी राज्यव्यापी संपूर्ण लॉकडाऊनची (Lockdown) आवश्यकता आहे, असं मत राज्य कोविड टास्क फोर्सच्या (covid task force) बहुंताश सदस्यांनी रविवारी व्यक्त केंलं. त्यामुळे बुधवार, १४ एप्रिल रोजी साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यात ८ ते १४ दिवसांचे लाॅकडाऊन लागण्याची दाट शक्यता आहे.
यावरच चर्चा करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) वर्षा निवासस्थानी होते. बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, टास्क फोर्सचे सदस्य डाॅ. संजय ओक, डाॅ. शशांक जोशी, डाॅ. अविनाश सुपे, डाॅ. झहीर उडवाडिया, डाॅ. वसंत नागवेकर, डाॅ. राहुल पंडित, डाॅ. ओम श्रीवास्तव आदी सहभागी झाले होते.
टास्क फोर्सच्या बहुतांश सदस्यांनी कोरोना साखळी तोडण्यासाठी किमान १४ दिवस लाॅकडाऊन आवश्यक असल्याचे मत मांडले. यासंदर्भात मुख्यमंत्री बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करतील.
१४ एप्रिलनंतर राज्यात ८ ते १४ दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर करतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister Rajesh Tope) यांनी बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
लाॅकडाऊनच्या काळात हातावर पोट असणारे मजूर आणि कामगार यांना राज्य सरकारनं मदत करावी, अशी मागणी विविध राजकीय पक्षांकडून होत आहे. तसंच लॉकडाऊन लावण्यापूर्वी जनतेला तयारीसाठी पुरेसा अवधी मिळावा, अशी मागणी होत आहे. त्याचा विचार करून मुख्यमंत्री बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर निर्णय घेणार असल्याचं समजतंय.
टास्क फोर्सच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी अर्थ, कामगार, उद्योग, परिवहन आदी विभागांच्या सचिवांबरोबर बैठक घेतली. मुख्यमंत्री सोमवारी व्यापारी महासंघाशी चर्चा करणार आहेत. दारिद्र्य रेषेखाली गटाला लॉकडाऊन काळात कशी मदत करता येईल यासंदर्भात मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत.
हेही वाचा