राज्यात दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या मोठी चिंता वाढवणारी आहे. बुधवारी राज्यात तब्बल २३,१७९ नवीन रुग्ण आढळले. धक्कादायक म्हणजे देशातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी ६० टक्के अॅक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रासाठी ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत देशातील कोरोनाच्या स्थितीची माहिती दिली. भारतात सध्या २ लाख ५३ हजार ७४६ कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी १ लाख ५२ हजार ७६० अॅक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात बुधवार १७ मार्च रोजी नवीन २३ हजार १७९ रुग्ण, मंगळवार १६ मार्च रोजी १७ हजार ८६४ तर सोमवार १५ मार्च रोजी १५ हजार ५१ नवीन कोरोना रुग्ण आढळले.
देशातील १६ राज्यांमधील ७० जिल्ह्यांमध्ये गेल्या १५ दिवसांत करोनाचे रुग्णांची संख्या १५० टक्क्याने वाढली आहे. देशात ९ फेब्रुवारीला सर्वात कमी नवी रुग्ण आढळून आले होते. आता दर आठवड्याला कोरोनाचे ४३ टक्के रुग्ण वाढत आहेत.
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. राज्यातील जनतेने कोरोना नियमांचे पालन करून सहकार्य करावे. गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुवणे या कोरोना प्रतिबंध नियमांचा वापर नागरिकांकडून झाल्यास रुग्णसंख्येला आळा घालू शकतो. त्यामुळे लॉकडाऊन टाळण्याकरिता निर्बंधांचे पालन करावे.
हेही वाचा -