येत्या पंधरा दिवसांत आठ ठिकाणी नवीन तपासणी लॅब सुरू करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जेणे करून राज्यात कोरोना संशयितांचे नमुने जलद गतीनं तपासता यावेत.
उद्यापासून तीन ठिकाणी टेस्टिंगची सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. या नव्या लॅबसाठी एनआयव्हीकडून उपकरण मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
सध्या मुंबईतील कस्तुरबा आणि केईम रुग्णालयात करोना व्हायरसच्या चाचण्याची सुविधा उपलब्ध आहे. लवकरच जे.जे. रुग्णालयात चाचणी केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न आहे” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. जे. जेमध्ये गुरुवारपासून ही लॅब सुरू होईल.
राज्यात खासगी लॅबलाही चाचणीची परवानगी देण्यात येईल. पण त्यासाठी त्यांना आवश्यक परवानगी घ्यावी लागेल. साहित्याची व्यवस्थाही त्यांनाच करावी लागेल, असे राजेश टोपे म्हणाले.
तसंच ज्यांची पैसे देण्याची तयारी आहे, ते जास्त पैसे भरुन हॉटेलमध्ये क्वॉरन्टाईनमध्ये राहू शकतात. पण तिथे नियमांची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे असंही राजेश टोपे म्हणाले. तसंच केंद्र सरकार १० लाख नवी किट्स विकत घेत आहे, त्यामुळे त्याचाही तुटवडा होणार नाही असं मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितलंय.
येणाऱ्या काळात सरकारी कार्यालये पन्नास टक्के कर्मचाऱ्यांवर चालवता येतील का? याबद्दल विचार सुरू असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. तसंच सकराच्या धोरणांची अंमलबजावणी खात्रीलायक पद्धतीनं होईल अशी अपेक्षा आहे. खासगी कंपनीत वर्क फ्रॉम होमची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल, असंही त्यांनी सांगितलं.
राजेश टोपे यांनी बुधवारी एनआयव्हीला भेट देऊन सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यानी नवीन तपासणी लॅब सुरु करण्याबाबत माहिती दिली. दुबईग्रुपमुळे महाराष्ट्रात ५० टक्के कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढले असे राजेश टोपे म्हणाले.
हेही वाचा