मुंबईसह राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून आता ३२० वर जाऊन पाेहोचली आहे. खासगी आणि सरकारी प्रयोगशाळांची संख्या वाढल्याने रुग्णांच्या संख्येतही वाढ झाल्याचं राज्याच्या आरोग्य विभागाकडून म्हटलं जात आहे. परंतु टेस्टिंग किटच्या कमतरतेमुळे आता कोरोना व्हायरसच्या संशयितांचे नमुने तपासणीसाठी घेऊ नका, असं निर्देश आरोग्य विभागाकडून खासगी प्रयोगशाळांना देण्यात आले आहेत.
प्रयोगशाळांची संख्या वाढणार
राज्यात कोरोना चाचण्यांची सुविधा देशातील एकूण सुविधेपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक असून १३ शासकीय आणि ८ खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून दररोज ५५०० चाचण्या राज्यात होत आहेत. राज्यात आतापर्यंत ६३२३ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी ५९११ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यामध्ये अजून ३ शासकीय प्रयोगशाळांना मान्यता देण्यात येणार असून राज्यात शासकीय प्रयोगशाळांची संख्या १६ होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
हेही वाचा - सव्वा दोन लाख परप्रांतीय-मजुरांच्या जेवणाची व्यवस्था केलीय- मुख्यमंत्री
राज्यात कोरोना चाचण्यांची सुविधा देशात महाराष्ट्रात सर्वाधिक असून 13 शासकीय आणि 8 खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून दररोज 5500 चाचण्या करू शकतो.राज्यात आतापर्यंत 6323 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून 5911 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 31, 2020
मोफत उपचार होणार
तसंच राज्यात कोरोनाला सामोरे जाण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडे पुरेशी साधनसामुग्री उपलब्ध असून सध्या दीड लाख एन ९५ मास्क उपलब्ध आहेत. सुमारे ३५ हजार पीपीई किटस् तर २१ लाख ७० हजार ट्रीपल लेअर मास्क उपलब्ध आहेत. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार करण्यात येणार असून राज्यात या योजनेमध्ये सुमारे १ हजार रुग्णालये सहभागी होणार आहेत. त्याद्वारेही कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जातील, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.
हेही वाचा- नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, अजित पवारांचा जनतेला इशारा
तेवढेच नमुने घ्या
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, नवीन टेस्टिंग किट्सच्या अनुपलब्धतेमुळे खासगी प्रयोगशाळांना नवीन नुमने तपासणीस घेण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यासंबंधीचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. हातात जेवढी साधनसामुग्री आहे, तेवढेच नमुने मार्गी लावण्यास त्यांना सांगण्यात आलं आहे.