कोरोनानं भारतात शिरकाव केल्यानंतर या विषाणूचा प्रसार वेगानं होत आहे. देशात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात हा आकडा ५२ वर पोहोचला आहे. यात उल्हासनगरमधील एका ४९ वर्षीय महिलेचाही समावेश आहे. आता या महिलेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
उल्हासनगरमध्ये सापडलेली ही करोनाग्रस्त महिला काही दिवसांपूर्वीच शहरातील एका सत्संग कार्यक्रमाला उपस्थित होती, अशी माहिती पालिकेच्या तपासात समोर आली आहे. उल्हासनगरमधील या करोनाग्रस्त महिलेला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सध्या पालिकेच्या वतीनं घेण्यात येत आहे.
उल्हासनगरमधील ही महिला दुबईहून काही दिवसांपूर्वी भारतात आली होती. त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्यांचीही चाचणी करण्यात आली आहे. तर, या महिलेच्या कुटुंबियांना वेगळं ठेवण्यात आलं आहे. मात्र आता या महिलेचा संपर्क १५०० लोकांशी आलेला असल्यामुळं सध्या उल्हासनगरमध्ये भीतीचे वातावरण आहे. संबंधित महिलेनं ८ मार्च रोजी उल्हासनगरमधील एका संत्संगाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.
कोरोनाग्रस्त महिला ४ मार्च रोजी दुबईहून भारतात आली होती. त्यानंतर ८ मार्च रोजी तिनं या संत्संगाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर तब्येत खालवल्यमुळं तिची चाचणी करण्यात आली. या चाचणीत महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं उघड झालं. मागील १५-२० दिवसांत या महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सध्या पालिका घेत आहे. अद्याप पालिकेला या लोकांचा शोध घेता आला नाही आहे.
कल्याणमधल्या आणखी एका व्यक्तीची कोरोनाव्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या रुग्णाला कस्तुरबामध्ये पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पण चिंतेची बाब म्हणजे या व्यक्तीनं सोलापूरमधील एका लग्नाला उपस्थिती लावली होती. त्यामुळे या रुग्णाच्या प्रवासाची संपूर्ण माहिती जमा करण्यात आली. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आलं.
कल्याणमधील कोरोनाग्रस्त जवळजवळ १,००० लोकांच्या संपर्कात आला असावा. तो रुग्ण ज्यांच्या संपर्कात आला त्यांची माहिती मिळवण्यात आली आहे. परंतु त्यांच्यामध्ये आतापर्यंत कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. आतापर्यंत कल्याणमध्ये कोरोगनाग्रस्त ३ रुग्णांची चांचणी पॉझिटिव्ह आढळी आहे. कोरोनाच्या वाढच्या प्रादुर्भावामुळे अश:हा लॉकडाऊनची वेळ महाराष्ट्रावर आली आहे.
हेही वाचा