जपानच्या योकोहामा बंदरात अडकलेल्या डायमंड प्रिन्सेस क्रूझवर कोरोनो व्हायरसच्या रुग्णांची संख्या १७५ वर पोहोचली आहे. या जहाजावरील भारतीय महिला सुरक्षा अधिकारीनं भारत सरकारला मदतीसाठी आवाहन केलं आहे. ही महिला सुरक्षा अधिकारी मुंबईची आहे. कोरोना व्हायरसमुळे एका दिवसात २४२ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर चीनमध्ये मृतांची संख्या वाढून १ हजार ३६५ झाली आहे. त्याचबरोबर ५९ हजाराहून अधिक रुग्णांची पुष्टी झाली आहे.
३ फेब्रुवारीपासून ही क्रूझ जपानमध्ये आहे. या क्रूझमध्ये इतर प्रवाशांसोबत अनेक भारतीय आहेत. यापैकीच मुंबईत राहणारी २४ वर्षीय सोनाली ठाकूर ही क्रूझवर सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या व्हिडिओ कॉलिंग मुलाखतीद्वारे तिनं भारत सरकारला मदतीसाठी आवाहन केलं आहे.
तसंच सोनाली व्हिडिओ कॉलिंगमध्ये म्हणाली की, "क्रूझवर संक्रमण वेगानं पसरत आहे. आम्ही सुद्धा या आजाराचे बळी पडू की काय? अशी भिती आम्हाला आहे. आम्हाला फक्त घरी परत जायचे आहे. आम्हाला भारत सरकारनं परत भारतात घेऊन जावं आणि तिथे उपचार करावेत. नाहीतर तुम्ही काही वैद्यकिय कर्मचाऱ्यांना आमच्या मदतीसाठी पाठवावं. कारण इथली वैद्यकिय सेवा अपुरी पडत आहे. क्रूझवरील प्रवाशांचे तपासणीसाठी नेलेले नमुने देखील येण्यास उशीर होत आहे."
डायमंड प्रिन्सेस क्रूझमध्ये असणाऱ्या १६० भारतीयांनी देखील भारत सरकारची मदत मागितली होती. काही दिवसांपूर्वी उत्तर बंगालमधील एक शेफ बिनय कुमारनं देखील सोशल मीडियावर भारत सरकारकडे मदतीसाठी आवाहन केलं होतं. “कृपया लवकरात लवकर आम्हाला वाचवा. आम्हाला काही झाले तर? मला भारत सरकार, मोदीजी यांना सांगायचं आहे की, कृपया आम्हाला इथून वेगळं करा आणि सुरक्षितपणे भारतात परत आणा."
डायमंड प्रिन्सेस क्रूझमध्ये बसलेल्या दोन भारतीयांना बुधवारी कोरोना व्हायरसची लागण झाली. त्यांचा अहवाल सकारात्मक आला आहे. बुधवारी जपानमधील भारतीय दूतावासानं ही माहिती दिली. या जहाजात प्रवासी आणि चालक दल सदस्यांसह १६० भारतीय होते, अशी माहिती दूतावासानं दिली. जपानमध्ये व्हायरसच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी १९ फेब्रुवारीपर्यंत बंदरातच जलपर्यटन ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जहाजात एकूण ३ हजार ७११प्रवासी आहेत. जेव्हा जहाजात बसलेल्या एका प्रवाशाला विषाणूची लागण झाल्याचं दिसून आलं तेव्हापासून ते बंदरावरच थांबवलं गेलं आहे.
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोना व्हायरसवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विट केलं होतं की, "कोरोनाव्हायरस हा आपल्या लोकांसाठी आणि आपल्या अर्थव्यवस्थेसाठी गंभीर धोका आहे. मला वाटतं की सरकार या धोक्यास गांभीर्यानं घेत नाही.”
हेही वाचा