Advertisement

झोपडपट्टी, गावठाणांमध्ये कचरामुक्तीचे 'झिरो वेस्ट मॉडेल', नवी मुंबई पालिकेचा अभिनव उपक्रम

या अभिनव उपक्रमाव्दारे कचरा वेचून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावणाऱ्या कचरावेचक महिलांना हक्काचा व नियमित रोजगार उपलब्ध झाला आहे.

झोपडपट्टी, गावठाणांमध्ये कचरामुक्तीचे 'झिरो वेस्ट मॉडेल', नवी मुंबई पालिकेचा अभिनव उपक्रम
SHARES

झोपडपट्टी, गावठाणांमध्ये कचरामुक्तीचे 'झिरो वेस्ट मॉडेल' हा अभिनव उपक्रम नवी मुंबई महापालिकेने राबवण्यास सुरूवात केली आहे. या अभिनव उपक्रमाव्दारे कचरा वेचून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावणाऱ्या कचरावेचक महिलांना हक्काचा व नियमित रोजगार उपलब्ध झाला आहे. कचऱ्याची नियमानुसार योग्य विल्हेवाट लावण्याप्रमाणेच महिला सक्षमीकरणाच्या दिशेने नवी मुंबई महानगरपालिकेने उचलेलेले हे सकारात्मक पाऊल आहे.

दररोज निर्माण होणा-या कच-याचे घरातच ओला व सुका असे वर्गीकरण करून तो महानगरपालिकेच्या कचरागाड्यांमध्येही वेगवेगळा दिला जाणे घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार अनिवार्य आहे. नागरी वसाहती तसेच सोसायटी भागांतून याला चांगला प्रतिसाद मिळत असून गांवठाण व झोपडपट्टी भागातही अशाच प्रकारे घराघरातून ओला व सुका कचरा वर्गीकरण व्हावे आणि तो वेगवेगळा संकलित व्हावा याकरिता महानगरपालिकेच्या वतीने ठोस पावले उचलण्यात येत आहेत.

याबाबत स्त्री मुक्ती संघटनेशी सामंजस्य करार करण्यात आला असून कचरावेचक महिलांमार्फत गांवठाण व झोपडपट्टी भागातील घराघरांतून ओला व सुका अशा वेगवेगळ्या स्वरूपात कचरा संकलित केला जात आहे. सकाळी ७ वाजल्यापासून या महिला कचरा संकलन सुरू करीत असून एक महिला  ९ ते ९.३० वाजेपर्यंत २५० घरातील कचरा संकलन करीत आहे. याकरिता त्यांना १२० लिटर क्षमतेच्या हिरव्या व निळ्या कचरापेट्या देण्यात आल्या आहेत.

या कचरापेट्यांना चाके लावलेली असल्याने या महिलांना विनासायास संकलित कचऱ्याची वाहतुक करणे शक्य होत आहे. हा संकलित ओला कचरा वस्तीच्या एका जागी बनविण्यात आलेल्या शेडमधील कम्पोस्ट पीटच्या ठिकाणी आणला जात असून त्यावर खतनिर्मिती  प्रक्रिया केली जात आहे. सुका कचरा या कचरावेचक महिलांमार्फत रद्दीवाले, भंगारवाले यांना विक्री केला जात असून त्यामधून त्यांना उदरनिर्वाहासाठी रक्कम प्राप्त होत आहे. 

सध्या तुर्भे विभागातील हनुमाननगर व इंदिरानगर झोपडपट्टी, कोपरखैरणे विभागातील अडवली भूतावलीगाव, ऐरोली विभागातील समतानगर याठिकाणी कार्यवाही सुरू करण्यात आली असून त्याला रहिवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिघा विभागातील बिंदुमाधव नगर तसेच गणेशनगर येथेही काही दिवसांतच शून्य कचरा प्रकल्प सुरू होत आहे. सदर संकल्पना गतिमानतेने इतर गावठाणे व झोपडपट्ट्यांमध्येही राबविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.



हेही वाचा -

कोरोना: मुंबईतील गर्दीच्या ठिकाणांवर महापालिकेची नजर

राज्यात आठवड्यानंतर कडक निर्बंधांचे संकेत



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा