Advertisement

नवी मुंबईतील मेगागृहप्रकल्पाचा विरोध मावळणार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ९० हजार घरांच्या गृहप्रकल्पामुळे शहराचं नियोजन बिघडण्याविषयी भीतीही व्यक्त करण्यात आली होती. परंतु आता भाजपाच्या गोटात जाऊन सामील झाल्याने सुतार यांचा विरोध मावळणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नवी मुंबईतील मेगागृहप्रकल्पाचा विरोध मावळणार?
SHARES

नवी मुंबईतील विविध ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून तब्बल ९० हजार घरं बांधली जाणार आहे.या महागृहप्रकल्पामुळे शहरातील पाणी पुरवठा, मलनिःस्सारण व्यवस्था, रस्ते वाहतूक आदी पायाभूत सुविधांवर ताण पडणार असल्याचं म्हणत नवी मुंबई महापालिकेचे महापौर जयवंत सुतार यांनी मुख्यमंत्र्यांच्या ड्रिम प्रोजेक्टला विरोध केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या गृहप्रकल्पामुळे शहराचं नियोजन बिघडण्याविषयी भीतीही व्यक्त करण्यात आली होती. परंतु आता भाजपाच्या गोटात जाऊन सामील झाल्याने सुतार यांचा विरोध मावळणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काय लिहिलं होतं पत्रात?

नवी मुंबई शहराच्या नियोजनासाठी राज्य सरकारने १९७१ साली सिडकोची नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केली होती. भविष्यात २० लाख लोकसंख्या गृहीत धरून ३४४ चौरस किलो मीटर क्षेत्राचं नियोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर १९९२ मध्ये नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाली. १९९१ च्या अधिसूचनेनुसार महापालिका हद्दीत ३० गावांचा समावेश केल्यावर महापालिकेच्या हद्दीत १०९.३ चौ.किमी क्षेत्रफळ आलं. त्यानंतर राज्य सरकारने २००८ मध्ये नवी मुंबई शहराचं नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोकडील अधिकार काढून ते महापालिकेकडे दिले. 

दरम्यानच्या काळात सिडकोने शहरातील विविध नोड, सेक्‍टर, रेल्वे स्थानक, बसस्थानक, डेपो व ट्रक टर्मिनल्स यांचा वापर रहिवासी वापराकरीता केल्याने शहरातील नियोजीत १५ लाख लोकसंख्येचा आकडा केव्हाच पार केला आहे. शहरात नवनीन वाहनांची भर पडत असल्याने पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत शहरातील रेल्वे स्थानकांमधील वाहनतळ, ट्रक टर्मिनल्स आणि कळंबोली येथील बस स्थानक परिसरातील मोकळ्या जागांचा वापर गृहसंकुलासाठी केल्यास शहराच्या वाहतूककोंडीत भर पडू शकेल. तसंच वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे पायाभूत सुविधांवरही अतिरिक्त ताण निर्माण होईल. त्यामुळे हा गृहप्रकल्प रद्द करावा, अशी मागणी सुतार यांनी केली होती.  

कळंबोलीतील जागा महापालिकेची

सिडकोतर्फे कळंबोली बस स्थानकाच्या काही घरं उभारण्यात येणार आहे. मात्र सिडकोने कळंबोली सेक्‍टर २ मधील भूखंड क्रमांक १० महापालिकेला आधीच हस्तांतरीत केला आहे. याठिकाणी महापालिका एनएमएमटी द्वारे पनवेल, उरण आणि आदी शहरात वाहतूक सुविधा पुरवणार आहे. मात्र महापालिकेची परवानगी न घेताच सिडकोने थेट हा भूखंड गृहप्रकल्पाच्या वापरासाठी नियोजित केला आहे. हे चुकीचे असल्याचंही महापौरांनी पत्रात नमूद केलं आहे.

भाजपात प्रवेश

मात्र बुधवारी नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक, नवी मुंबई महापालिकेचे महापौर जयवंत सुतार यांनी ४८ नगरसेवकांसोबत भाजपात प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे मुख्यमंत्र्यांच्या ड्रिम प्रोजेक्टला असलेला सुतार यांचा विरोध मावळणार का? असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. 



हेही वाचा-

गणेश नाईक यांचा ४८ नगरसेवकांसह भाजपात प्रवेश

Good News! सिडकोच्या जमिनीची मालकी आता रहिवाशांकडे



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा