प्रकाशाचा सण मानण्यात येणारी दिवाळी तोंडावर आलेली असतानाच मुंबईसह राज्य अंधारात गेले आहे. तब्बल २ हजार मेगावॅट विजेची टंचाई असल्याने महावितरणने गुरूवारपासून राज्यभर लोडशेडिंग लागू केले आहे. मुंबईतील भांडुप, मुलुंडसह मध्य उपनगरही लोडशेडिंगच्या कचाट्यातून सुटलेले नाही. यापुढे दिवसातून कुठलेही अडीच तास मुलुंडकर आणि भांडुपकरांना अंधारात काढावे लागणार आहे. तर ठाणे शहरातही तब्बल ७ तास लोडशेडिंग लागू करण्यात आल्याची माहिती महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.
देशातील अनेक कोळसाखाणीतून पावसामुळे कोळसा पुरेशा प्रमाणात काढण्यात आलेला नाही. त्यामुळे देशभरात कोळशाची टंचाई जाणवू लागली आहे. त्याचा फटका वीजनिर्मिती केंद्रांना बसला आहे.
कोळशा उपलब्ध व्हावा आणि विजेची निर्मिती वाढावी यासाठी महावितरणकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे येत्या पाच-सहा दिवसांत काही तरी सकारात्मक घडेल अशी आशा आहे. असे झाल्यास लोडशेडिंग हळूहळू कमी करता येईल. त्याचवेळीस मुलुंड आणि भांडुपमधील लोडशेडिंग, तर एक-दोन दिवसांतच रद्द करण्याचे आमचे प्रयत्न आहेत.
-पी. एस. पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)