वाशी खाडी पुलावर होणाऱ्या उड्डाण पुलाला कोळी समाजानं कडाडून विरोध केला आहे. या पुलाचं बांधकाम पुढील चार ते पाच वर्षे सुरु राहणार आहे. त्यामुळं याचा थेट परिणाम मासेमारी व्यवसायावर होईल अशी भीती कोळी समाजाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
नवी मुंबईतून मुंबईत प्रवेश करताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळं इथं आणखी एक उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय एमएसआरडीसीनं घेतला. पण, पुलाच्या बांधकामामुळं मासेमारी व्यवसायावर याचा विपरित परिणाम होईल अशी भीती कोळी समाजाकडून सातत्यानं व्यक्त करण्यात येत आहे.
२०२३ किंवा त्यापुढील आणखी एका वर्षापर्यंत या पुलाचं बांधकाम पूर्ण राहणार असल्याचं सांगण्यात आल होतं. सध्या वाहतूक सुरू असणाऱ्या खाडी पुलाच्या शेजारीच नव्या बांधकामाची तयारी करण्यात आली आहे. या पुलासाठी जवळपास ७७५ कोटींहून अधिक रक्कम खर्चली जाणार असल्याचं कळत आहे.
रेल्वे रुळ आणि सध्याचा खाडी पूल यांच्यामध्ये असणाऱ्या जागेमध्ये या पुलाच्या बांधकामाला सुरुवातही करण्यात आली होती. पण, आता कोळी समाजाकडून या उड्डाणपुलाला होणारा विरोध पाहता पुलाच्या बांधकामासंबंधी कोणता निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा