Advertisement

मासिक पाळीचा बागुलबुवा किती दिवस? लहान मुलींशी संवाद साधणं गरजेचं!

बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या मुलींना १० ते १५ वयोगटातच मासिक पाळी येऊ शकते. त्यामुळे मुलींना लहानपणापासून आईने मासिक पाळी म्हणजे काय? याचं ज्ञान दिलं पाहिजे. शिवाय, तिच्याशी या विषयी मोकळेपणाने बोललं पाहिजे. मासिक पाळी आल्यानंतर घाबरुन न जाता आपण त्या वेळी काय केलं पाहिजे? याची समज आणि मार्गदर्शन आधीच दिलं पाहिजे.

मासिक पाळीचा बागुलबुवा किती दिवस? लहान मुलींशी संवाद साधणं गरजेचं!
SHARES

आई-वडील लहानपणापासूनच मुलांची जडणघडण चांगल्या पद्धतीनं व्हावी, यासाठी प्रयत्न करत असतात. मुलांना शिक्षण कसं चांगलं मिळेल? याकडेच सर्व पालकांचा कल असतो. पण, मुलांच्या शिक्षणाव्यतिरीक्त त्यांच्यात होणारे शारीरिक बदल याविषयी कदाचित आई-वडील मुलांसोबत तितकंस गांभीर्याने, किंबहुना मोकळेपणाने बोलत नाहीत. विशेषत: वाढत्या वयात मुलींच्या शरीरात होणाऱ्या बदलांवर आई-वडील तेवढ्या मोकळेपणाने संवाद साधत नाहीत अशी खंतही बऱ्याचदा मुली बोलून दाखवतात.


बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव

बदलत्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाला. पिझ्झा, बर्गरसारख्या जंक फूडमुळे ओबेसिटीचं प्रमाण वाढतं. त्यामुळे मुलींच्या शरीरातील हार्मोन्सचा समतोल बिघडतो. त्याचा परिणाम अनेकदा मुलींना मासिक पाळी १० ते १५ वयोगटात येते. त्यामुळे ज्या वयात मासिक पाळी म्हणजे काय? हेच माहीत नसतं, त्या वयात पाळी आल्यामुळे मुली घाबरुन जातात.



नाकळत्या वयात पाळी येते तेव्हा...

कविता (बदललेलं नाव) ही सातवी इयत्तेत शिकत होती. एकदा शाळेत असताना अचानक तिच्या ओटीपोटीत दुखायला लागलं. काहीतरी झालं आणि तिचा शाळेचा ड्रेस लाल झाला म्हणून ती खूप घाबरली. वर्गातील कुठल्याच मुलीला किंवा मुलाला कळत नव्हतं, की नेमकं तिच्यासोबत काय घडलं? ती धावत धावत वॉशरूममध्ये गेली. तिने आपलं अंतर्वस्त्र तपासलं. खेळताना चुकून गुप्तांगाला काही लागलं आहे का? हेही बघितलं. आपल्याला नेमकं काय झालं आहे? हे कळू न शकलेली कविता खूप घाबरली. नंतर तिला तिच्या शिक्षिकेनं घरी पाठवलं.


काय म्हणतात डॉक्टर?

खरंतर, मुलींना हे मासिक पाळीविषयीचं ज्ञान लहानपणापासूनच दिलं गेलं पाहिजे. आणि त्यासाठी आई-वडिलांचा मुलींशी संवाद हा सर्वात महत्त्वाचा आहे. याविषयी, अधिक सखोल माहिती घेण्यासाठी 'मुंबई लाइव्ह'ने कामा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ.राजश्री कटके यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी मासिक पाळीविषयी आई-वडिलांनी नेमकं कशा पद्धतीने मुलींना समजावलं पाहिजे? यावर सविस्तर प्रकाशझोत टाकला...



आईची भूमिका सर्वात महत्त्वाची!

बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या मुलींना १൦ ते १५ वयोगटातच मासिक पाळी येऊ शकते. त्यामुळे मुलींना लहानपणापासून आईने मासिक पाळी म्हणजे काय? याचं ज्ञान दिलं पाहिजे. शिवाय, तिच्याशी या विषयी मोकळेपणाने बोललं पाहिजे. मासिक पाळी आल्यानंतर घाबरुन न जाता आपण त्या वेळी काय केलं पाहिजे? याची समज आणि मार्गदर्शन आधीच दिलं पाहिजे.


हार्मोन्समुळे होतात शरीरात बदल

मासिक पाळी यायच्या आधी किंवा पाळी आल्यानंतर मुलीच्या शरीरात हार्मोन्स बदलतात. ती वयात येऊ लागते. त्यामुळे बऱ्याचदा तिच्यावर गुप्तांग दुखण्याची समस्या ओढवू शकते. जे नैसर्गिक आहे. त्याला घाबरुन जाऊ नये. बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये मासिक पाळीत लैंगिक संबंध ठेवणं हे देखील किती धोक्याचं असू शकतं? याबाबतची माहितीही मुलींना आईने किंवा शाळेतील शिक्षकांनी दिली पाहिजे.



स्वच्छतेची विशेष काळजी घ्या!

मासिक पाळी आल्यानंतर मुलीने आपल्या शरीराची विशेष काळजी घ्यायला हवी. सॅनिटरी पॅड वापरले पाहिजेत. पॅड दर ५ ते ६ तासांनी बदलले पाहिजे. एखाद्या ठिकाणी जर वॉशरुमला जायचं असेल, तर ती जागा स्वच्छ आहे की नाही ते एकदा तपासून बघितलं पाहिजे. जेणेकरुन इन्फेक्शन होणार नाही.


घरच्यांनी समजूतदारपणा दाखवावा

मासिक पाळी आलेल्या मुलीच्या हार्मोन्समध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतात. त्यामुळे तिला मानसिक आणि शारीरिक असे दोन्ही बदल जाणवत असतात. त्यामुळे तिचा मूड अचानक बदलण्याची शक्यता असते. चिडचिडा स्वभाव, नाराजी वाटणे, थकवा येणे, काहीच करु नये असे वाटणे अशा गोष्टी घडू शकतात. अशा काळात त्यांचा बदललेला स्वभाव घरच्यांनी समजून घेतला पाहिजे.


घरातील वातावरण प्रेमाचं हवं

जर मुलांना घरातच चांगल्या पद्धतीचे संस्कार मिळाले, तर मुलं बाहेर इतर गोष्टींकडे वळणार नाहीत. वय लहान असल्याकारणाने सर्व गोष्टी खोलात जाऊन जाणून घेण्याची त्यांची नैसर्गिक उत्सुकता असते. त्यामुळे मोबाईल किंवा सोशल मीडियाचा वापर एकूणच कुटुंबियांनीही कमी केला पाहिजे. त्यांनी एकदा बाहेर अर्थ शोधण्याचा प्रयत्न सुरू केला, तर अशा मुलांवर नियंत्रण ठेवणं कठीण होतं.

लैंगिक शिक्षणाचाच एक भाग म्हणून मासिक पाळीविषयी अधिक जागृती होणं गरजेचं आहे. शिवाय लहान मुलींच्या बाबतीत तर पालकांनी आणि शिक्षकांनी अधिक सजग राहाणं गरजेचं आहे. मात्र असे करतानाच मासिक पाळीविषयीच्या कोणत्याही अंधश्रद्धेला घरात, शाळेत आणि समाजात थारा मिळणार नाही, याचीही काळजी घेणं आवश्यक आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा