प्रत्येक सिनेमाचं आपलं नशीब म्हणतात, ते काही खोटं नाही. एखादा हलका फुलका विनोदी किंवा काल्पनिक सिनेमा अल्पावधीत बनतो आणि प्रदर्शितही होतो. पण ज्वलंत विषय मांडणाऱ्या सिनेमांना अडथळ्यांची शर्यत पार करत सिनेमागृहापर्यंत मजल मारावी लागते. अशाच प्रकारे अनेक अडचणींवर मात करत अखेर ‘आक्रंदन’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.
आजवर ९० पेक्षा अधिक मालिकांचं दिग्दर्शन करणाऱ्या शशिकांत देशपांडे यांनी ‘आक्रंदन’चं दिग्दर्शन केलं आहे. अनेकदा समाजात स्त्रीकडे भोगवस्तू म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे लैंगिक अत्याचाराच्या घटनांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या भयाण वास्तवाचं दर्शन घडवत जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या ‘आक्रंदन’ची पहिली झलक केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. ज्येष्ठ दिग्दर्शक राजकुमार संतोषी, अल हज हजरत झहीद हुसैन चिश्ती यांच्यासह बरीच मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती.
समाजातील संवेदनशील विषयाला चित्रपटाच्या माध्यमातून वाचा फोडण्याच्या प्रयत्नाला दाद देत आठवले यांनी ‘आक्रंदन’ला शुभेच्छा दिल्या. विवेक पंडित प्रस्तुत व गोविंद आहेर निर्मित ‘आक्रंदन’ चित्रपटामध्ये एका गरीब, असहाय्य महिलेवर झालेली अत्याचाराची घटना, त्यानंतर एकत्र येत समाजाने न्यायासाठी केलेला उठाव याभोवती चित्रपटाचं कथासूत्र गुंफण्यात आलं आहे.
उपेंद्र लिमये, शरद पोंक्षे, मिलिंद इनामदार, गणेश यादव, बाळ धुरी, विक्रम गोखले, स्मिता तळवळकर, अमिता खोपकर, प्रदीप वेलणकर, उदय टिकेकर, भारत गणेशपुरे, तेजश्री प्रधान, विलास उजवणे, पल्लवी वाघ, स्नेहा बिरांजे या कलाकारांच्या ‘आक्रंदन’मध्ये भूमिका आहेत. कथा शशिकांत देशपांडे यांनी लिहिली असून, पटकथा- संवाद शशिकांत देशपांडे व मिलिंद इनामदार यांनी लिहिले आहेत. ७ सप्टेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -
डेजी शाह स्कोर ट्रेंड्स इंडियावर नंबर वन!
गोट्यांचा खेळ पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न