Advertisement

२ सप्टेंबरपासून मशिदी उघडणारच, इम्तियाज जलिल यांचं ठाकरे सरकारला आव्हान

एमआयएम या पक्षाचे खासदार इम्तियाज जलिल यांनी देखील सरकारने परवानगी दिली नाही, तरी २ सप्टेंबरपासून मशिद उघडणार असं आव्हान ठाकरे सरकारला दिलं आहे.

२ सप्टेंबरपासून मशिदी उघडणारच, इम्तियाज जलिल यांचं ठाकरे सरकारला आव्हान
SHARES

राज्यातील विविध धर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्यास महाराष्ट्र सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी आता सातत्याने सरकारकडे होऊ लागली आहे. सरकारने परवानगी न दिल्यास आंदोलन करू असा पवित्राही घेतला जात आहे. त्यातच एमआयएम या पक्षाचे खासदार इम्तियाज जलिल यांनी देखील सरकारने परवानगी दिली नाही, तरी २ सप्टेंबरपासून मशिद उघडणार असं आव्हान ठाकरे सरकारला दिलं आहे. (aimim mp imtiaz jaleel demands to open all masjids in maharashtra)

एका वृत्तवाहिनीशी बोलताना एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल म्हणाले की, येत्या १ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन आहे. हा हिंदू बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असल्याने या दिवसापासून राज्यातील सगळी मंदिरं उघडण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी आणि २ सप्टेंबरपासून राज्यातील मशिदी उघडण्यासही परवानगी द्यावी. प्रार्थनास्थळं न उघडण्याबाबत सरकारचे काही योग्य तर्क असतील, तर आम्ही ते ऐकून घेऊ. परंतु परवानगी न दिल्यास कुठल्याही स्थितीत आम्ही २ तारखेपासून मशिदी उघडूच. त्याची आम्ही औरंगाबादमधून करणार असल्याचं इम्तियाज जलिल यांनी सांगितलं. 

हेही वाचा - Raj Thackeray: मॉल उघडले तर मंदिरं का नाहीत?- राज ठाकरे

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे सर्वसामान्यांसाठी मार्च महिन्यापासून बंद ठेवण्यात आलेली आहेत. त्यातच आर्थिक व्यवहारांना चालना देण्यासाठी राज्य सरकार माॅलपासून बाजारपेठा ते इतर उद्योगधंद्यांना अटी-शर्थींच्या आधारे परवानगी देत असताना प्रार्थना स्थळं उघडण्यास परवानगी का नाही? असा प्रश्न सातत्याने भाविकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

याच प्रश्नावर राज्य सरकारला धारेवर धरत सर्वोच्च न्यायालयाने जैन धर्मियांच्या पर्युषण काळात मुंबईतील ३ मंदिरे उघडण्यास परवानगी दिली होती. हाच धागा पकडत पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर वारकऱ्यांसाठी उघडण्यात यावं अन्यथा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १ लाख वारकऱ्यांचं आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वारकऱ्यांकडून सरकारला देण्यात आला आहे. 

काही दिवसांपूर्वी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील काही पुजाऱ्यांनी मंदिरं खुली करण्याच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत राज ठाकरे यांनी राज्यातील माॅल सुरू होऊ शकतात, तर मंदिरं का नाही? असा सवाल सरकारला केला होता. कोरोनासंदर्भातील सुरक्षा नियमांचं पालन करुन प्रार्थनास्थळे उघडण्याची परवानगी देण्यात यावी, असा सल्लाही त्यांनी दिला होता.

हेही वाचा - 'विठ्ठल मंदिर उघडा', प्रकाश आंबेडकर करणार वारकऱ्यांसोबत आंदोलन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा