दहिसर - आशिष शेलार... भाजपाचे मुंबई अध्यक्ष. त्यामुळे सहाजिकच मुंबई महानगरपालिकेची धुरा ही आशिष शेलार यांंच्याकडे असणार आहे. सध्या आशिष शेलार यांच्या रडारवर काँग्रेस-राष्ट्रवादी नसून, शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख आहेत. आशिष शेलार यांनी अनेकदा ट्वीटरच्या माध्यमातून वा त्यांच्या भाषणातून शिवसेनेवर वार केलाय आणि आता पुन्हा एकदा शेलार यांनी दहीसरच्या कार्यक्रमात शिवसेनेच्या वर्मावर घाव घातलाय.
आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेला खासदार गोपाळ शेट्टी यांनी देखील साथ दिली. त्यांनी तर निवडणुकांमध्ये असे आरोप प्रत्यारोप होतच राहणार असं सांगून, यापुढे या दोन्ही पक्षांमध्ये पुढे किती रामायण मुंबईकरांना बघावे लागेल याचे संकेत दिले.
युती झाली नाही तर मुंबई महानगरपालिकेत सत्तेमध्ये असणारे दोन्ही मित्रपक्ष एकमेंकासमोर दंड थोपाटून उभे राहणार हे नक्की. मात्र या दोघांच्या आरोप-प्रत्यारोपांचं नाट्य मुंबईकरांचं निवडणूक संपेपर्यत मनोरंजन करणार यात शंका नाही. त्यामुळे ये तो शुरूवात है पिक्चर अभी बाकी है असं म्हणण्या खेरीज मुंबईकरांकडे सध्या तरी पर्याय नाही.