शिवसेनेची भाजपाने फसवणूक केली आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी केला. आमची सध्याची भूमिका ही वेट अँड वाॅचची आहे, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
भाजपा आणि शिवसेनेकडून राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबत काहीच निर्णय होत नसल्याने अशोक चव्हाण इतर काँग्रेस नेत्यांसह दिल्लीला सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा द्यावी अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. याबाबत सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आदी नेते दिल्लीला गेले आहेत. यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी शिवसेनेची भाजपाने फसवणूक केली असून आमची भूमिका वेट अँड वाॅचची आहे, असं म्हटलं आहे.
सुशीलकुमार शिंदे आणि संजय निरुपम यांनी शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा देऊ नये असं म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे आणि शिवसेनेची विचारधारा वेगळी आहे, असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. तर भाजपा आणि शिवसेनेच्या भांडणात काँग्रेसने पडायची गरज नाही असं निरुपम यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -
...अन्यथा राष्ट्रपती राजवट लागू होईल, भाजपचा शिवसेनेला इशारा
शिवसेनेला पाठिंबा देण्यास सुशीलकुमार शिंदेंचा विरोध