सर्वोच्च न्यायालयाने कोरेगाव-भीमा परिसरात झालेल्या दंगलीतील प्रमुख आरोपी मिलिंद एकबोटेंचा जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने अटक केली आहे. परंतु, या प्रकरणातील दुसरा आरोपी संभाजी भिडे यांच्याविरूद्ध सरकार काहीच कारवाई का करत नाही? असा प्रश्न विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला.
या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असून एकबोटेंप्रमाणे संभाजी भिडे यांच्यावरही तातडीने कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही विखे पाटील यांनी विधानसभेत केली.
एकबोटे यांच्या अटकेसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, ''भीमा-कोरेगावची दंगल राज्य पुरस्कृत दंगल होती, असा आरोप आम्ही सातत्याने करीत आलो आहेत. मिलिंद एकबोटेंना अटक करण्यासाठी पोलिसांनी दाखवलेल्या दिरंगाईतून आमचा आरोप स्पष्ट झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात पोलीस सांगतात की, एकबोटे आम्हाला सापडत नाही आणि एकबोटे सांगतात की, पोलिसांनी मला बोलावलंच नाही. यातून सर्व प्रकरण स्पष्ट होते.''
सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज प्रलंबित असताना एकबोटे सापडत नाहीत, असं सांगणाऱ्या पोलिसांना जामीन अर्ज नामंजूर झाल्याबरोबर एकबोटेचा पत्ता कसा काय मिळतो? यावरही सरकारने खुलासा करायला हवा, अशी मागणीही विखे पाटील यांनी केली.
हेही वाचा-
कोरेगाव-भीमा प्रकरणातील गुन्हे मागे घेणार- मुख्यमंत्री