बुधवारी सकाळी मंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न झाल्यावर विरोधकांनी सरकारी यंत्रणेला जाब विचारत टीकेची झोड उठवली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं वाढतं प्रमाण, मंत्रालयात येऊन आत्महत्या करण्याचे प्रकार व त्यात आता सुशिक्षित बेरोजगारांची पडलेली भर पाहता फसणवीस सरकार राज्यातील जनतेसोबत ‘ब्ल्यू व्हेल गेम ’खेळत आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.
अविनाश शेटे नावाच्या तरुणाने सहाय्य्क कृषी अधिकारी पदासाठीची परीक्षा दिली होती. मात्र याबाबत सरकारने कसलाही निर्णय घेतल्याने अविनाश वारंवार मंत्रालयात चकरा मारत होता. वारंवार मंत्रालयात फेऱ्या मारून थकलेल्या अविनाशने बुधवारी मंत्रालयाच्या गार्डन गेटसमोर अंगवार रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे सरकार रोजगारनिर्मितीचा कितीही ढोल बडवत असले तरी प्रत्यक्षात नोकऱ्या नाहीत.
बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये आलेल्या नैराश्येचं हे द्योतक असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. तसंच त्याच्या तक्रारीची दखल घेऊन त्याला सरकारने न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही केली आहे.
शेतकऱ्यानंतर आता सुशिक्षित बेरोजगार ही मंत्रालयात येऊन आत्महत्या करू लागले आहेत. त्यामुळे सरकारने सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार गमावल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देऊन पायउतार होण्याची मागणी त्यांनी ट्विटद्वारे केली आहे.
हेही वाचा-
मंत्रालयाबाहेर तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न