राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या विजया रहाटकर यांचा अर्ज मागे घेण्यात येईल. ही निवडणूक बिनविरोध होईल असाच प्रयत्न राहील, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी दिली. विजया रहाटकर यांनी डमी उमेदवार म्हणून अर्ज भरला असून अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्या अर्ज मागे घेतील.
राज्यसभा निवडणुकीत मतांच्या कोट्यात भाजपाच्या ३ जागा निवडून येणार हे स्पष्ट आहे. परंतु, भाजपाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांचा अर्ज भरल्याने निवडणुकीत रंगत आली होती. महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून येण्यासाठी मतांचा कोटा ठरला आहे.
उमेदवार निवडून येण्यासाठी ४२ मतांची गरज आहे. यामध्ये भाजपकडे १२२ मते असल्याने त्यांचे ३ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे प्रत्येकी ४१ मते असल्याने त्यांचा एक उमेदवार निवडून आणायचा आहे. त्यासाठी त्यांना इतर पक्षांकडून मतांची तरतूद करावी लागणार आहे. समाजवादी पक्ष, शेकाप आणि अपक्ष आमदारांवर त्यांची भिस्त आहे. शिवसेनेने अनिल देसाई यांनी पुन्हा उमेदवारी दिली असून त्यांच्याकडे अतिरिक्त मतांचा कोटा आहे. पण हा कोटा भाजपला मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित.