'भाजपनं अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे. सत्तेचा कितीही गैरवापर करा, पण आम्ही पुरून उरू, असं सांगतानाच, विश्वासदर्शक ठरावावेळी आमचा आकडा दहाने जास्त असेल’, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं. तसंच, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार आणि भाजपमध्ये झालेल्या 'डील'विषयी आज मोठा गौप्यस्फोट केला आहे.
शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांचं महाविकासआघाडीचं सरकार राज्यात येणार असल्याची चर्चा असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केली. अजित पवारांनी दिलेल्या धक्क्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा पक्षाला सावरण्यासाठी सरसावले असून, काही आमदार राष्ट्रवादीकडे परतले आहेत. तर अजूनही काही आमदार 'बेपत्ता' असल्याचं बोललं जात आहे.
या सर्वघटनेनंतर शिवसेनेचे खासदार राऊत यांनी भाजपवर तोफ डागली आहे. अजित पवार यांना भाजपकडून मुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. अडीच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री आणि अडीच वर्षे अजित पवार हे मुख्यमंत्री होतील अशी ऑफर देऊ केली आहे, असा दावा राऊत यांनी केला. अजित पवार यांच्यासोबत गेलेले सर्वच आमदार परतले आहेत.
काही आमदारांना गुरूग्रामच्या एका हॉटेलमध्ये डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी भाजपवर केला. आमदारांच्या सुटकेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे लोकही गेले होते. त्यांना परत आणण्यात आलं आहे. ते आमदार आता भाजपनं कशा प्रकारे दबाव आणला, याचा वृत्तांत सांगत आहेत. त्यांना काही ऑफर देण्यात आल्या, तर काहींना भीती दाखवण्यात आली, असा दावाही राऊत यांनी केला.
हॉटेलमध्ये ५ ते ६ लोकांना डांबून ठेवलं होतं. त्यांच्यावर पहारा देण्यासाठी भाजपनं गुंड ठेवले होते, हरयाणात सरकार असल्यानं त्याचा गैरफायदा घेऊन पोलीस बाहेर तैनात केलं होतं. लोकशाहीसाठी हे चांगलं लक्षण नाही. मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी या देशातील राज्यकर्ते कुठल्या थराला जात आहेत. हे सगळं घृणास्पद आहे. बहुमत असल्याचं राज्यपालांना सांगितलं आणि शपथ घेतली. मग गुंडगिरी, दरोडेखोरी हे सगळं करण्याची गरज काय आहे. भाजपनं असं करून राज्यपाल, राष्ट्रपती आणि महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केली आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
'सत्तेचा कितीही गैरवापर करा. आम्ही पुरून उरू. कितीही गडबड, घोटाळे करा, पण विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी तुमच्यापेक्षा आमच्याकडं दहानं आकडा अधिक असेल, असा दावा त्यांनी केला. भाजपच्या नेत्यांची माथी फिरलेली आहेत. सत्ता नसेल तर यांना वेड लागेल. महाराष्ट्रात आमचं सरकार आल्यानंतर आरोग्यमंत्र्यांना सांगून त्यांच्यासाठी मनोरुग्णालये उभारण्यास सांगू’, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
हेही वाचा -
हम होंगे कामयाब! नवाब मलिक यांचं ट्विट
अजित पवारांच्या गटाला १२ मंत्रीपदं,१५ महामंडळ?