केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली आहे, या अटकेचा आम्ही संपूर्णत: निषेध, धिक्कार करतो. राज्य सरकारला आणि विशेषत: शिवसेनेला आम्ही गर्भित इशारा देऊ इच्छितो की सुरुवात तुम्ही केलीय शेवट आम्ही करु!, असं म्हणत भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, संपूर्ण सन्मान ठेवून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमचा सवाल आहे की, १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचा महाराष्ट्र सरकारचा कायक्रम होता. या सरकारी कार्यक्रमात महाराष्ट्राला संबोधित करताना स्वातंत्र्याचा हिरक महोत्सव की अमृत महोत्सव याबद्दल ते शंकीत होते की मुद्दामहून करत होते, हे आधी त्यांनी स्पष्ट करावं.
हेही वाचा- ‘ही’ तर लोकशाहीची हत्या, राणेंच्या अटकेनंतर भाजपकडून ठाकरे सरकारवर टीका
केंद्रीय मंत्री @MeNarayanRane जींना राज्य सरकारच्या पोलिसांच्यावतीने आता अटक करण्यात आली आहे, या अटकेचा आम्ही संपुर्णत निषेध, धिक्कार करतो. राज्यसरकारला आणि विशेषत: शिवसेनेला यातला गर्भित इशारा आम्ही देउ इच्छितो सुरुवात तुम्ही केलीय शेवट आम्ही करु! @BJP4Maharashtra pic.twitter.com/FY0Ff8QyCn
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 24, 2021
ज्यांना देशाच्या स्वातंत्र्याचा हिरक की अमृत महोत्सव आहे हे ठाऊक नाही, त्यांच्या वक्तव्याबाबत काय करायचं? देशाचे जवान, पॅरा मिलिट्री, नेव्ही, आर्मी, पोलिस, लोकं देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना, त्याच्या आनंदात भर घालायचा की आनंदावर विरजण घालायचं? आपल्या विरोधी देशांना आनंद वाटावं असं वक्तव्य जर मुख्यमंत्री करत असतील, तर त्यांच्यावर कुणी गुन्हा दाखल करायचा, असा प्रश्न विचारत सुरुवात तुम्ही केलीय शेवट आम्ही करु!, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला.
तर दुसरीकडे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा यांनी राज्य सरकारवर टीका करताना म्हटलं की, महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केले, तो प्रकार म्हणजे घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन आहे. अशा कृतीमुळे आम्ही घाबरणार नाही किंवा दबूनही जाणार नाही. हे लोकं जन-आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजपला मिळत असलेल्या प्रचंड पाठिंब्यामुळे त्रस्त झाले आहेत. आम्ही लोकशाही पद्धतीने लढत राहू, आमचा प्रवास चालूच राहणार, असं म्हणत राज्य सरकारवर टीका केली.