भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांची महायुती झाल्याचं सोमवारी जाहीर करण्यात आलं असलं, तरी अद्याप कुठला पक्ष किती जागा लाढवणार हे सूत्र अजूनही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार भाजप १६४ आणि शिवसेना १२४ जागांवर लढत देणार आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होणार की दोन्ही पक्ष वेगवेगळे लढणार याकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मागील अनेक दिवसांपासून युती होणार असं म्हणत असले, तरी दोघांकडूनही अजूनही जागावाटपाचा निश्चित आकडा जाहीर करण्यात आलेला नाही.
त्यातच शिवसेनेने रविवारपासून एबी फॉर्मचे वाटप सुरू केलं, तर भाजपानेही उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी संयुक्त पत्रकाद्वारे महायुतीची घोषणा केली. पण या पत्रकात जागा वाटपाचा आकडा मात्र देण्यात आला नाही.
गेली ५ वर्षे भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीने राज्याला नव्या उंचीवर नेऊन ठेवले असून, राज्यातील विधानसभा निवडणुकीतही महायुती कायम ठेवण्यात येणार आहे. निर्णयात आरपीआयचे नेते रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत हे मित्रपक्षांचे नेतेही सहभागी आहेत, असं चंद्रकांत पाटील आणि सुभाष देसाई यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चेत शिवसेना १२४ आणि भाजप मित्रपक्षांसह १६४ जागा लढविणार यावर शिक्कमोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा-
भाजपची पहिली यादी जाहीर, कुणाला मिळालं तिकीट, कुणाचा पत्ता कट?
मुख्यमंत्र्यांविरोधात खटला चालणार, प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप