आरक्षणाला विरोध करणारे आणि आरक्षणाच्या बाजूने असणाऱ्या दोन गटांमध्ये दंगली भडकवून देशात अराजकता माजवायची आणि नंतर आणीबाणी लावून निवडणूक पुढे ढकलायची, असा भाजपा सरकारचा कट असल्याचा खळबळजनक आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी केला. बेलार्ड पीअर येथील पक्षाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकरांनी हा आरोप केला.
गेल्या ४ वर्षांपासून आम्ही भाजपाविरोधात लढतोय. त्याची मोठी भीती भाजपाला वाटत आहे. याच भीतीतून दंगल कशी होईल आणि परिस्थिती त्यांच्या बाजूने कशी जाईल यासाठी प्रयत्न होत आहे. मराठा आरक्षण आणि सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आरक्षणाबाबतच्या निर्णयानंतर दंगल होईल, अशी अपेक्षा त्यांना होती. पण तसं झालं नाही.
त्यामुळं आता आरक्षणविरोधी आणि आरक्षणवादी अशा दोन फळ्या राज्याराज्यांमध्ये उभ्या करत त्यांच्यामध्ये दंगली लावून देत देशात अराजकता माजवण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरू आहे. एकदा का दंगली झाल्या की मग देशात आणीबाणी जाहीर करायची नि निवडणुका पुढं ढकलायच्या हा सरकारचा डाव आहे. भीमा-कोरेगाव इथं झालेला हिंसाचारही त्यातलाच प्रकार आहे.
१ जानेवारीच्या दंगलीला हिंसाचाराला जे जबाबदार आहेत, ज्यांच्यावर आरोप आहे त्या मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांच्याविरोधात कारवाई होत नाही, तपास होत नाही. उलट नियोजनबद्ध पद्धतीनं पोलिसांना हाताशी धरत, सत्तेचा वापर करत सत्ताधारी आमच्यावरच धाडी घालताहेत. न्यायालयानं धाडी कशासाठी घालताय? अशी विचारणा केली असताना पोलिस काहीही उत्तर देऊ न शकल्यानं धाडीसंदर्भातील दोन्ही अर्ज न्यायालयाने नाकारले. पण त्यानंतरही या धाडी टाकल्या जाताहेत. यावरूनच यामागे सरकारचा काय कट आहे हे लक्षात येत असल्याचंही आंबेडकर यांनी म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नक्षलवाद्यांकडून आलेल्या धमकीच्या पत्राबाबत विचारलं असता आंबेडकरांनी हा केवळ आणि केवळ सहानुभूती मिळवण्याचा आणि लोप पावत चाललेली लोकप्रियता परत मिळवण्यासाठीचा कट असल्याचाही आरोप त्यांनी केला. जर मोदींना एवढी भिती वाटत असेल, तर सध्याची ७ झोनची सुरक्षा १४ झोनची करावी असा सल्ला देत हा केवळ पब्लिसिटी स्टंट असल्याचंही म्हटलं आहे.
मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना दिलेल्या धमक्यांच्या पत्रांमध्ये काॅ. प्रकाश हे नाव नमुद असल्याचं समोर आलं. त्यानंतर प्रसारमाध्यमांतून काॅ. प्रकाश हे प्रकाश आंबेडकरच असल्याचं दाखवलं गेलं, त्यांना नक्षलवादी ठरवलं गेलं नि यावरूनही मोठा वाद सुरू झाला. पण आता मात्र काॅ. प्रकाश हा गोहाटीतील व्यक्ती असून प्रकाश आंबेडकर काॅ. प्रकाश नसल्याचं पोलिसांकडूनच जाहीर करण्यात आल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली आहे. तर काॅ. प्रकाश ही वेगळीच व्यक्तिीअसल्यानं आता हे प्रकरण इथंच संपलं असल्याचंही आंबेडकरांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा-
भीमा-कोरेगाव हिंसाचार: आरोपींना १४ जूनपर्यंत पोलिस कोठडी
भीमा-कोरेगाव हिंसाचार: कबीर कला मंचच्या कार्यालयावर धाडी