भारतीय जनता पार्टीने आपल्या विजयाची घोडदौड कायम ठेवत मिरा-भाइंदर महापालिकेत देखील आपला झेंडा फडकवला आहे. विशेष म्हणजे बहुमताचा आकडा पार करत भाजपाने 61 जागांवर विक्रमी आघाडी घेतली आहे. तर शिवसेना 22, काँग्रेस 10 आणि इतरांना 2 जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे.
विशेष म्हणजे इतर पालिका निकालांप्रमाणे या निवडणुकीत देखील राष्ट्रवादीच्या पदरी अपयश आले आहे. मीरा-भाइंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. तर काँग्रेस तिसऱ्या स्थानावर फेकली गेली आहे.
2012 च्या निवडणुकांच्या तुलनेत शिवसेनेला यावर्षी चांगले यश मिळाले आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेला 14 जागा मिळाल्या होत्या. यावेळी शिवसेनेच्या वाट्याला 22 जागा आल्या आहेत. शिवसेनेचे सत्तास्थापनेचे स्वप्न मात्र भंगले आहे.
मिरा-भाईंदरकरांनी "लबाडाघरचे आमंत्रण" नाकारले..पारदर्शी विकासाची हमी देणाऱ्या भाजपचा दणदणीत विजय करून स्विकारले! मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन! !
— ashish shelar (@ShelarAshish) August 21, 2017
मिरा-भाईंदर महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीत भाजपानेच सर्वाधिक 32 जागा जिंकल्या होत्या. मात्र तेव्हा काँग्रेस 18 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 26 जागा जिंकत अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली होती. मात्र भाजपाचे तेव्हा भंगलेले सत्तास्थापनेचे स्वप्न आता मात्र पूर्ण झाले आहे.
पक्ष | 2012 चे निकाल | 2017 चे निकाल |
---|---|---|
भाजपा | 32 | 61 |
शिवसेना | 15 | 22 |
काँग्रेस | 18 | 10 |
राष्ट्रवादी | 26 | 0 |
इतर | 4 | 2 |
मिरा भायन्दर निवडणूक भाजपा भव्य विजय शिवसेना दारुण पराभव आत्ता बांद्रा सुप्रीमो वास्तविकता स्वीकारणार प्रधानमंत्री मुख्यमंत्री चे मान राखणार
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 21, 2017
दरम्यान, निकालानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे आता तरी तुमचा अहंकार संपणार का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला आहे.
हेही वाचा