राज्यातील गरीब आणि दुर्धर रुग्णांची आर्थिक सहायता करणाऱ्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीलाच सध्या सहाय्यतेची गरज पडली आहे. या निधीत १०० कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळावं याकरीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध उद्योजकांची भेट घेणार आहेत.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मिळावी यासाठी ४००० गरजू रूग्णांनी नोंदणी केली आहे. यांत मुंबईतील १५०० रुणांचा समावेश आहे. या रुग्णांना आर्थिक मदत देण्यासाठी १०० कोटींची आवश्यकता आहे. परंतु सध्या सहाय्यता निधीत खडखडाट असल्याने मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांच्या दातृत्वाला हात घालण्याचं ठरवलं आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीचं आयोजन केलं असून या बैठकीत महिंद्रा अँड महिंद्रा, आदित्य ब्रिर्ला ग्रुप, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, एचडीएफसी बँक आणि रोटरी समूहाचे उद्योजक आणि प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
रुग्णांची संख्या वाढल्याने सहाय्यता निधीला पैशांची चणचण जाणवत असल्याचं म्हटलं जात आहे. २०१५ मध्ये ७,०९३ रुग्णांनी आर्थिक मदतीसाठी सहाय्यता निधीकडे नोंदणी केली होती. या रुग्णांची संख्या वाढून २०१९ पर्यंत ३४,२६१ एवढी झाली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत प्रामुख्याने साखर उद्योगाकडून मिळणाऱ्या पैशांची भर पडत होती. साखरेवर आकारण्यात येणाऱ्या प्रति क्विंटल ४ रुपये इतक्या ‘सेस’च्या माध्यमातून वर्षाला २५ कोटी रुपयांची रक्कम निधीत जमा होत होती. परंतु सध्या साखर उद्योग संकटात असल्याने हा निधी आटला आहे.
चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत १८, ७६५ रुग्णांवर निधीतील १८८ कोटी खर्च झाले आहेत. आता निधीत पैसेच शिल्लक न उरल्याने उद्योजकांकडून मिळणाऱ्या सीएसआर फंडातून पैसे जमा करण्याकडे मुख्यमंत्र्यांचा कल आहे.
हेही वाचा-
'छगन कमळ बघ' अजित पवारांच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचं चोख प्रत्युत्तर
उसळीत चिकन, कँटीन चालकावर काय कारवाई करणार? अजित पवारांचा सरकारला प्रश्न